Monday, 4 June 2018


दास डोंगरी राहातो

संतचरित्रे आणि संतचारित्र्ये हा अगदी सुरवातीपासून मराठी भाषेचा अभिमानास्पद वारसा राहिला आहे. १०व्या-११व्या शतकात मराठी ही स्वतंत्र भाषा म्हणून प्रस्थापित झाल्यापासून अखंड चालत आलेली ही संतपरंपरा आजही महाराष्ट्राच्या हृदयात अक्षय्य टिकून आहे. कित्येकदा तिच्या कामावरच नव्हे तर उपयुक्ततेवरही अनेक आक्षेप घेतले गेले. ही परंपरा वैराग्याचा आदर्श देणारी आहेजीवन निरुपयोगी आणि जग निरर्थक असल्याचा संस्कार करणारी आहेलोकजीवनाला पराङ्मुख आहे अशा अनेक आरोपांची राळ वेळोवेळी तिच्यावर उडवली गेली. परंतू हे सर्व जर खरे असेल तर असे असतानाही संतांना इतका प्रदीर्घ काळ जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य करणे कसे शक्य झाले याचे उत्तर देण्याची जबाबदारी मात्र आरोप करणाऱ्यांपैकी कुणी कधी घेतली नाही. इतिहासाचा सामाजिक अंगाने अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनीच फक्त सतराव्या शतकात स्थापन झालेल्या मराठी राज्याच्या पायाभरणीत मराठी संताचे योगदान मान्य केले. असे योगदान देणाऱ्या संतांच्या मांदियाळीतले एक झगमगते नाव म्हणजे समर्थ रामदास आणि त्यांच्या आयुष्यावरची गो. नी. उपाख्य अप्पा दांडेकरांची चरित्रात्मक कादंबरी म्हणजे दास डोंगरी राहातो’.

सावधानहा शब्द कानी येताच लग्नाच्या बोहोल्यावरून ठोसरांच्या नारायणाने पळ काढला इथून अप्पांची कादंबरी सुरु होते आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर येऊन संपते. अप्पा समर्थांना नुसते रामभक्त म्हणून नव्हे तर मराठी राज्याचा पाया भरणारे संत म्हणून पाहतात. त्यामुळे समर्थांचे व्यक्तिमत्व उभे करताना अप्पांचे लक्ष समर्थांच्या सामाजिक रूपाकडे जास्त प्रमाणात आहे. परंतु हे रूप कसे सिद्ध होणार याचा विचारही आप्पांच्या मनात आहे. कादंबरी वाचताना हे सतत जाणवते. अप्पा परिणाम आणि पद्धत दोन्हीकडे पहाता आहेत.

समर्थांच्या अवताराचा काळ इ.स. १६०६ ते १६८२ हा होता. देवगिरीचे अखेरचे मराठी राज्य चौदावे शतक उजाडता उजाडताच बुडाले आणि महाराष्ट्र परवशतेच्या पाशात सापडला. या परकी सत्तेने निव्वळ लोकांचे सामाजिक-आर्थिक आयुष्य व्यापले नाही तर त्यांच्या सांस्कृतिक अस्तित्वालाच ग्रहण लावले. एक-दोन नव्हे तर साडेतीनशे वर्षे महाराष्ट्र हे सोसत होता आणि अशा अंधाऱ्या काळात ठोसर कुळात नारायणाचा जन्म झाला. विचक्षणहूड आणि कोणत्याही गोष्टीत झोकून देण्याच्या स्वभावामुळे नारायण लहानपणापासूनच वेगळा होता. त्यातच लहान वयात पितृवियोग त्याने सोसला. वडील गेल्यानंतर थोरले बंधू आणि आई यांनीच त्याला सांभाळले. रामभक्तीची मूळ प्रेरणाही थोरल्या बंधूंकडूनच मिळाली. नारायणाच्या लग्नाचा विचार घरात सुरु झाला तेव्हा तो ते फार गंभीरपणे घेत नव्हताच. पण खरोखरच पायात बेडी पडायची वेळ झाली तेव्हा मनाने आपली दिशा निवडली.

बोहोल्यावरून पळालेल्या नारायणाचे श्रीराम’ हे ध्येय ठरलेलेच होते. प्रश्न उपासनेचे स्थान निवडण्याचा होता. पुरश्चरणासाठी लोकांतापासून थोडे दूर असणारे टाकळी हे गाव नारायणाने निवडले. नाशिकपासून ते सहज चालत जाण्याच्या अंतरातच आहे. त्यामुळे पुरश्चरणाचा नेम संपला की नारायण मधुकरीला पाच घरे फिरे आणि जिव्हालौल्याला थारा न देता झोळी झटकून तीन प्रहरी नाशकाकडे निघे. उपनिषदेवेदांततर्कसांख्य-वैशेषिकगीताभाष्य अशा पाठांना तो आळीपाळीने हजर राही. रामभक्ती तर त्याला अतिप्रिय होतीच. पण कोणत्याही अभ्यासात स्वतःची चिकित्सक बुद्धी हरवून जाऊ नये यासाठीही तो दक्ष होता. नारायणाच्या या दक्षतेकडे अप्पा कटाक्षाने आपले लक्ष वेधतात. शांकरमठातला ऐतरेय उपनिषद पाठ संपल्यावर नारायण शंका विचारतो की अपक्रामन्तु गर्भिण्यः’ असे उपनिषदाच्या पोथीतच असेल तर त्याचा अर्थ इथपर्यंतचा भाग स्त्रियांनी ऐकला तरी चालेल असा होत नाही कायआणि पर्यायाने स्त्रियांनाही वेदपठण आणि वेदाध्ययनाचा अधिकार आहे असाच याचा अर्थ निघत नाही कायशिकवणारे शास्त्रीबोवा निरुत्तर होतात. कारण परंपरा केवळ शास्त्र मानत नाही. ती शास्त्राद्रुढिर्बलीयसी’ या नियमाला जास्त बांधील असते हे त्यांना माहीत आहे. पण ते कबूल करण्याची त्यांची इच्छा नाही. नारायणाची बांधिलकी मात्र रुढींशी नाहीफक्त शास्त्राशी आहे. ज्या रूढी समाजाचे सुयोग्य धारण करीत नाहीतत्या रुढींशी नारायणाला काडीमात्र घेणे-देणे नाही.

अप्पांना समर्थांची इतकी असोशीने ओढ असण्याचे कारण समाजधारणा या गोष्टीचे अप्पांनाही वेड आहे हेच आहे. समर्थांपासून अप्पांच्यापर्यंत आणखी तीन शतके गेली असल्याने अप्पांना जगी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावेजागी वंद्य ते सर्व भावे करावे’ या शिकवणीपेक्षा सद्यःकाळी समाजाला हानिकारक ते सर्व सोडोनि द्यावे आणि जे जे उपयोगी ते सर्व भावे करावे हा विचार जास्त भावतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'संगीत उत्तरक्रियानाटकात यशवंतराव नावाचे एक पात्र आहे. हा यशवंतराव अत्यंत तत्वनिष्ठ आणि तर्कनिष्ठ आहे. समुद्रपर्यटन हे त्याकाळी बंदी असलेले कृत्य केल्याबद्दल त्याला स्थानिक ब्रह्मवृंद प्रायश्चित्त देऊ पाहतोतेव्हा समुद्रपर्यटनबंदी हा समाजाला घातक असणाऱ्या रूढीचा भाग आहेअसा विचार मांडून यशवंतराव तुळशीपत्राचेही प्रायश्चित्त घेण्याचे साफ नाकारतो. अप्पाही याच विचाराचे समर्थक असल्यामुळे त्यांच्या कादंबरीत समर्थांचे हे समाजधारक रूपच अतीव प्रेमाने आणि आस्थेने येते. समर्थांचे काळाच्या पुढे असणे अप्पा प्रेमाने मांडतात.

समर्थांचा एकांतही लोकांसाठी होता हे अप्पांचे ठाम मत आहे. त्यामुळे लोकांपासून दूर रहाणे हे समर्थांच्या एकांताचे रूप नाही. लोककल्याणासाठी अंतर्दृष्टी मिळवणेत्यासाठी सतत अभ्यास आणि चिंतन करणे हे या एकांताचे स्वरूप आहे. दिसामाजि काहीतरी ते लिहावेप्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ हे समर्थांनी आधी स्वतः वर्षानुवर्षे आचरणात आणले तेव्हाच लोकांना सांगितले. चिंतनाने विचारांची अवस्था जसजशी परिपक्व होत जातेतसतसा नारायणाचा आचार बदलतो. मधुकरी मागताना आधी दृष्टी जमिनीवर लावून उभे राहणारा नारायणकाहीतरी निर्णयावर येऊन पोचतो तेव्हा घरांमधले वातावरण समजून घ्यायला लागतोसंस्कारक्षम वयातल्या अपरिपक्व मुलांना बरोबर घेऊन काही नवीन करू पाहतोआपले म्हणणे लोकांना समजावू पाहतो.हे अपूर्व अप्पा तपशीलाने मांडतात. बायको पळवली अशी तक्रार सांगत रडणाऱ्याला समर्थांचा उपदेश मुळातूनच वाचायला पाहिजे. ते रामाचेच उदाहरण देतात. रावणाने सीता पळवली तेव्हा रामाने कुणालाही गाऱ्हाणे सांगितले नाही. राक्षसांचा राजा असलेल्या अर्तुबळीमहारथी रावणाच्या लंकेवर तो वानरे आणि अस्वलांच्या सहाय्याने चालून गेला. अप्पांची ही मांडणी पाहिली की मला नेहमी वैचारिकदृष्ट्या अप्पांच्या उलट्या टोकाला असलेल्या विंदा करंदीकरांची आठवण येते. विंदा लिहितात,
रामायण वाचुनिया नंतर - बोध कोणता घ्यावा आपण?
श्रीरामासम मिळता नायकवानरसुद्द्धा मारिती रावण
कमी आहे ती संकल्पाचीनिर्धाराची आणि सामर्थ्य एकवटू शकणाऱ्या अपार श्रद्धेची हे समर्थ लोकांच्या मनावर बिंबवू पाहतात. त्यासाठी श्रद्धासामर्थ्य आणि संकल्प असा गुरुमंत्र नुसता देऊन थांबत नाहीत तर ज्या हनुमंताचे सारे आयुष्य याच मंत्राचे जितेजागते उदाहरण होतेत्याची दैवत म्हणून स्थापना करतातत्याचे रूप कायम लोकांच्या डोळ्यांसमोर असावे म्हणून त्याचे स्तोत्र-आरत्या रचतात. परंतू उद्दिष्टांवर समर्थांचे लक्ष सतत असते. त्यामुळे ज्या क्षणी आजवर पाहिले ते पुरेसे नाही हे जाणवते त्याच क्षणी कुणाला पत्ताही न लागू देता समर्थ उत्तर भारताच्या यात्रेला निघतातजे आपणच बनवले आहे ते क्षणात सोडून द्यायला समर्थ जराही मागेपुढे पहात नाहीत.



नारायण ठोसर या मुलाचा रामदास बनला तो नाशिकच्या पाठशाळेत. पण साध्यासुध्या रामदासमधून समर्थ उदयाला आले ते उत्तर भारताच्या यात्रेत. यात्रेत मिळवलेल्या या सामर्थ्याचे दोन पैलू होते. एक होता अपार यातनांना थेट सामोरे जाण्याचा. यातना-वेदना-दुःख- फक्त आपले नव्हेपूर्ण देशाचेसर्व मानवतेचे. दुष्काळ! साऱ्या देशालाच खायला उठलेला दुष्काळअसा एक दुष्काळ की ज्याचे गाऱ्हाणे प्रत्यक्ष रामरायाशिवाय कुणाला सांगावेज्याचे वर्णन करताना समर्थांची वाणी कळवळून आली.
पदार्थ मात्र तितुका गेलानुस्ता देशचि उरला....
.... येणेकारणे बहूतालासंकट जाले...
माणसा खावया अन्न नाहीअंथरूण-पांघरूण तेही नाही...
...अखंड चिंतेच्या प्रवाहीपडिले लोक
आणि ही अस्मानी कमी पडली म्हणूनच की काय- तिच्या जोडीला एक सुलतानी-
देश नासला नासला उठे तोचि कुटी
पिके होताचि होताचि होते लुटालुटी
काळाकरितां जिवलगां झाली ताटातुटी
अवघ्या कुटुंबा कुटुंबां होत फुटाफुटी

१९४३-४४मध्ये बंगालमध्ये तीव्र दुष्काळ पडला. (याच दुष्काळावर हरिवंशराय बच्चन’ यांनी १९४६ साली बंगाल का काल’ हे काव्य लिहिले आणि पुढे १९७३मध्ये सत्यजित राय यांनी अशनि संकेत’ नावाचा सिनेमा बनवला.) विसाव्या शतकाच्या मध्यावरसुद्धा हा दुष्काळ एक महाभयंकर नैसर्गिक आपत्ती ठरला. मग सतराव्या शतकात लोकांचे काय झाले असेल याची कल्पनाही करवत नाही. माणसांच्या हालांना पारावार राहिला नसेल हे सहज समजू शकते. आणि तरीही जीवन थांबत नाही. जीवमात्रांची प्राणरक्षण ही एक अनैच्छिकनैसर्गिक प्रेरणा आहे. प्राणरक्षणासाठी त्यांना काही कारण लागत नाही. या राखलेल्या जिवाचे काय करायचे याचा विचार कधी त्यांना सुचतच नाही. कादंबरीतही अंमलदाराने ओझे वाहायला जबरदस्तीने नेलेली गाढवेओझे जागेवर पोचल्यावर काय केली याची माहिती मिळण्यासाठी शिपायांच्या हातापाया पडून आलेल्या कुंभाराला आपण पराकाष्ठेने वाचवलेल्या या जिवाचे काय करायचे याचा काही थांगपत्ता नव्हता. अप्पांचे वैशिष्ट्य हे की या प्रश्नाचे उत्तर तेव्हा स्वामींकडेही नव्हते हे त्यांनी कबूलच केले आहे. इतरेजनांकडे नसलेली एक गोष्ट मात्र समर्थांच्या जवळ होती. श्रद्धा- अतूटअविचल श्रद्धा आणि त्या श्रद्धेसाठी कोणत्याही थराला जाण्याचीकसलेहीदिव्य करण्याची तयारी. त्यामुळे सुभेदार कतलूखानाच्या शासनातही स्वामी निभावून जाऊ शकले. त्यांच्या देशभ्रमणाचे हेच तर प्रयोजन होते- सर्व देश ज्या यातनांचक्रातून जात होता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे. त्यांचे आंतरिक सामर्थ्य त्यांना यातूनच मिळालेले होते.

देशभ्रमणातून समर्थांनी मिळवलेल्या सामर्थ्याचा दुसरा पैलू होता साऱ्या समाजाच्या जीवनमरणाचा एक प्रश्न आणि त्याचे त्यांना जाणवलेले उत्तर. नाशिक-टाकळीपासून समर्थांची भ्रमणयात्रा सुरु आली.नाशिकहून निघालेले समर्थ विदिशेला पोचलेवेत्रवती ओलांडली. सागरदमोह मागे पडले. देश बदललावेश बदललेभाषा बदलली. पण धर्मश्रद्धापूजा-अर्चाराम-कृष्ण-महादेवांची मंदिरे यापैकी काहीही बदलले नाही. पण इतकेच नाही. आणखीही काही गोष्टी बदलल्या नाहीत. कमालीचे प्राणभयभ्याडपणाअसेल ते उचलून मागे न बघता पळणेधैर्याचा पूर्ण अभावमुजोरांपुढे वाकणे आणि अन्यायाला मुकाट्याने शरण जाणेआजचे मरण उद्यावर ढकलण्याची धडपड- सगळे अगदी तेच आणि तसेच. मग प्रश्न पडायला लागले.हे असे काहे लोक झुंजत का नाहीतकुठेही पाय रोवून सरळताठ उभे का रहात नाहीतसगळ्यांच्याच पाठीचे कणे असे मोडले काकथेच्या ओघात अप्पांनी एक सुंदर प्रसंग सांगितला आहे.एका गावी रामायणपाठ सुरु असतो. कथावाचक कथा रंगवून रंगवून सांगत असतो आणि श्रोते भक्तिभावाने ऐकत असतात. शेजारीच एक मोठी थोरली सराई (धर्मशाळा) असते. व्यापारीमाल वाहून नेणारे लमाणांचे तांडेइतर प्रवासी असे अनेक जण तिथे उतरलेले असतात. तेवढ्यात एक लुटारू टोळी तिथे चालून येते आणि सगळे दृश्य अचानक बदलून जाते. रामकथा सांगणारा कथेकरी पोथी उचलून पळ काढतो. लमाण आणि सौदागरांबरोबरचे संरक्षक नावापुरती झुंज देतात.पण खऱ्या अर्थाने लुटारूंना विरोध करणारा तिथे कुणीच नव्हता. फार कष्ट न पडता त्यांना लूट मिळाली. थक्क होऊन हे सगळे पाहणाऱ्या समर्थांना प्रश्न पडला की लुटण्यासाठी आलेले धावेकरी शंभर. ही माणसे चार-पाचशे. त्यांच्यापाशी शस्त्रे होती. यांच्यापाशीही ती होतीच. मग हे एकमेळ करून उभे ठाकले का नाहीतका होष्यमाणास सामोरे गेले नाहीतअसे कुस्करले गेले काय म्हणूनसारा देश पायाखाली घातल्यानंतर आणि असंख्य लोकांशी बोलल्यानंतर जे उत्तर त्यांच्या मनात साकार झाले ते होते विखुरलेपणा. हे माझे लोक गुणी आहेतत्यांच्यात कर्तृत्व आहेइच्छा आहेधमक आहे. पण ते सारे एकेकटे आहेत. स्वतःपुरते पाहणारे हजार-पाचशे लोक हे शंभर लुटारूंना उत्तर नव्हे.

समर्थांना त्यावेळी जाणवलेले हे उत्तर फक्त तेव्हाच्या भारताचेच नव्हे तर आजच्याही साऱ्या जगाचे चित्र आहे. प्रख्यात जर्मन कवी मार्टिन नीमोलर यांची एक अप्रतिम कविता आहे. ते म्हणतात-
First they came for the Communists
And I did not speak out - Because I was not a Communist
Then they came for the Socialists
And I did not speak out - Because I was not a Socialist
Then they came for the trade unionists
And I did not speak out - Because I was not a trade unionist
Then they came for the Jews
And I did not speak out - Because I was not a Jew
Then they came for me
And there was no one left - To speak out for me.
अत्याचारी लोकांची मुख्य शक्ती त्यांची शस्त्रे ही नसते. बहुसंख्य लोकांचा विखुरलेपणा हे त्यांचे मुख्य भांडवल असते. समर्थांना हे जाणवले त्याला आता अर्धे सहस्रक उलटून गेले. पण आजचे चित्र तरी काय वेगळे आहेलंडनपॅरिसटोकियोस्पेनपाकिस्तानभारतसिरीयाइराक- सर्वत्र तेच. आक्रमक मूठभरजनता अनेकपट. पण आक्रमकच जोरात आणि जनता फक्त हैराण.

समर्थांना जाणवले की यात या जनतेचा दोष फार थोडा आहे. पायापुरते पाहणे हा दोष कसा म्हणावापायापुरते नको तर कुठे आणि कसे पहायचे हे यांना कुणी कधी सांगितलेच नाही आहेी. माणसे अयोग्य नाही आहेतत्यांचा योग्य जागी अचूक वापर करून घेणारा कुणी नाही आहे.
अमन्त्रम् अक्षरं नास्तिनास्ति मूलमनौषधम् ।
अयोग्यः पुरुषो नास्तियोजकस्तत्र दुर्लभः ||
हवा आहे योजक. बळाला तोटा नाही. हवा आहे रचनाकार. पण तो येणार कुठून आणि कसाएका शतकापूर्वी येऊन गेलेल्या संत एकनाथांनी बयादार उघड’ अशी निकराची हाक का दिली हे स्वामींच्या लक्षात आले आणि मग त्या बयालाच त्यांनी थेट रोखठोक गाऱ्हाणे घातले-
तुझा तू वाढवी राजा। शीघ्र आम्हाचि देखता
दुष्ट संहारिले मागे। ऐसे ऊदंड ऐकतो
परंतु रोकडे काही। मूळ सामर्थ्य दाखवी
कथा-पुराणांतून ऐकलेल्या राक्षस आणि दैत्यांच्या संहाराच्या कथांमध्ये समर्थांना काहीच रस नव्हता. मला आज तू काय देणार आणि हा दुर्लभ असणारा योजक कधी जन्माला घालणार’ हे ते जगन्मातेला विचारत होते. स्वतःसाठी एक काडीही न मागणाऱ्या या भक्ताची प्रार्थना बयेलाही ऐकावीच लागली आणि साऱ्या जगाला ललामभूत ठरू शकणारा इतिहास महाराष्ट्रात घडला.

मराठी राज्याच्या स्थापनेचा इतिहास हा महाराष्ट्राचा मानबिंदू आणि अभिमानबिंदू. शिवछत्रपतींच्या या इतिहासावर अप्पांचेही अपार प्रेम. राजांच्या स्वराज्यस्थापनेला आणि पुढेही राज्याच्या संरक्षण-संवर्धनाला समर्थांचा सक्रीय आशीर्वाद होता. साहजिकच दास....मध्येही मराठी राज्याच्या या इतिहासाला उठाव येतो. हे राज्य जोपासण्यातला समर्थांचा हात सहजच दिसू शकतो. त्यांची बद्रीकेदारची यात्रा ही जणू याच कामाची पूर्वतयारी होती. मुलांची मने कशी घडवावीतशरीरावर आपला ताबा असावा – शरीराचा आपल्यावर नव्हे हे कसे व्हावेकुणाबरोबर बोलताना कशी भाषा कामाला येतेदैवाच्या हवाल्याने जीव जगवणारे हे लोक रामोपासनेकडेबलोपासनेकडे कसे वळवावेतकसे कुणाला आपल्या नादी लावावे आणि कुणाचा नाद सोडून द्यावाविवेके सदा स्वस्वरूपी कसे रहावे आणि कसा यातनांची कितीही परमावधी झाली तरी मनी राम चिंतीत जावा तो कसा याचा सगळा स्वाध्याय या उत्तरयात्रेत समर्थांनी केला होता. आता महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी सुरु झाली. जनसामान्यांना आपले वाटणारे राज्य इथे आकाराला येत होते. त्याचा पाया भगवंताच्या अधिष्ठानाने बळकट करायचे समर्थांनी आरंभले.
मुख्य हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण
तिसरे ते सावधपण | सर्वांविषयी
याचे समूर्त प्रात्यक्षिक समर्थांनी महाराष्ट्राला दाखवले. अप्पांच्या कादंबरीचा अर्धा भाग समर्थांच्या याच कार्याला वाहिला आहे आणि अप्पांनी हे अतिशय डोळसपणे केले आहे. मुख्य हरिकथा निरूपण हे खरे. पण या क्रमामागे विवेक पाहिजे. राजकारण पूर्ण बुडता उपयोगी नाही. राजकारण सशक्त रहावे याचे तारतम्य राखलेच पाहिजे. तिथे जर नौका बुडाली तर हरिकथा निरूपण तरी कसे चालेलकुणाच्या बळावरतेव्हा नेमून दिलेल्या कामाचे धारे शिस्तीने सांभाळले पाहिजेत हे खरे. पण आपले राज्य स्वराज्य- टिकणे अत्यावश्यक आहे हे मनात पक्के पाहिजे. सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजन्ति पण्डिताः’ हे तर आम्हाला प्राचीन काळापासून माहित आहे. पण कोणत्या वेळी कोणत्या अर्ध्या भागाचा त्याग करायचा हे देशकालपरिस्थिती पाहून ठरवायचे असते. केव्हा अस्तित्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी तत्वाला मुरड घालायची आणि केव्हा तत्वांसाठी पंचप्राणही पणाला लावायला मागेपुढे पहायचे नाही हे समजणे हेच समर्थांचे शिक्षण होते. अप्पा समर्थांचे हे कार्य नेमक्या शब्दांत नेटकेपणाने मांडतात. मराठी मुलुखातल्या सगळ्या घडामोडींचे तपशील राजांना आणि स्वामींना कुठूनकसे मिळत होते याचे अप्पांनी या कादंबरीत रेखाटलेले चित्र मनोरम तर आहेचपण डोळे उघडणारेही आहे. अचूक माहितीसूक्ष्म तारतम्य आणि नीरक्षीर विवेक याचे जागते उदाहरण अप्पा इथे उभे करतात.

शिवछत्रपतींचा राज्याभिषेक हा समर्थांसाठी कृतार्थतेचा क्षण होता. त्या अतीव रोमहर्षक अनुभवाचे सार्थ वर्णन करण्यासाठी एकनाथांच्या प्रेरणांचे धागेदोरेच पुढे चालवणाऱ्या समर्थांना नाथांनीच बनवलेला चपखल शब्द आठवला- आनंदवनभुवन’. राज्याभिषेकाला समर्थ स्वतः उपस्थित नव्हते. पण त्या प्रसंगाचे संपूर्ण वर्तमान कानी आल्यावर त्यांना कसे वाटले असेल याचे अप्पांचे वर्णन अतिसुंदर म्हणावे असे आहे. तसेच दुसरे वर्णन शाहिस्तेखानाच्या पारिपत्यासाठी महाराज स्वतः निवडक लढावांसह थेट लाल महालात शिरले यावर समर्थांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया सांगतानाचे आहे. महाराजांच्या निर्णयासाठी समर्थ आगोचार’ असा शब्द वापरतात. या शब्दात कौतुकअभिमानकाळजी अशा अनेक छटा सहज सामावतात.

दास डोंगरी राहातो’ ही अप्पांची कादंबरी मला आवडते हे खरे. पण याचा अर्थ इथे सर्व काही अगदी साजिरेगोजिरे आहे असे नव्हे. कधीकधी वाटते अप्पा गोष्टी अतीच सोप्या करीत जातात. अप्पा स्वतः सरळसोट निर्मळ स्वभावाचे. त्यामुळेच ते सगळ्या गोष्टी सोप्या करतात की काय समजत नाही. समर्थांच्या उत्तर भारताच्या यात्रेत अप्पा एक प्रसंग वर्णन करतात. समर्थांची गाठ वाटमाऱ्यांच्या एका टोळीशी पडते. बरोबरचे यात्रेकरू प्राणभयाने पळू पाहतात. पण समर्थ त्यांना थांबवतात आणि थेट वाटमाऱ्यांच्या नायकाशी बोलतात. स्वधर्म आणि धर्माचे कर्म यांची त्याला आठवण करून देतात. त्यामुळे वाटमाऱ्यांचे हृदय परिवर्तन होते आणि ते वाटमारी सोडून जंगलातून जाणाऱ्या वाटसरूंना सुरक्षित जंगलापार पोचवण्याचे काम अंगिकारतात. प्रसंग मोठा हृदयस्पर्शी आहे. पण वाचताना मला काही प्रश्न पडतात. वाटमाऱ्यांनी तर त्यांच्या उपजीविकेचे साधनच त्यागले. आता त्यांच्या पोटापाण्याचे कायघोड्याने गवताशी मैत्री करायला हरकत नाही. पण मग घोड्याची उपजीविका कशी चालणारआता हे वाटमारे नेमके काय करतीलशेती किंवा शिलेदारी हीच दोन उत्तरे शक्य आहेतपण यांपैकी काहीही त्यांनी निवडले तरी मग हे वाटसरूंना जंगलापार पोचवण्याचे काम ते कसे करणारआणि स्वतः त्यांच्यावर धाडी येतीलइतर सर्वसामान्य माणसांसारखे तेही निर्नायकी अवस्थेला सामोरे जातील तर त्यांचे धैर्य आणि हे अंगीकृत कार्य किती काळ चालणारआपल्यासमोर यांची काहीही उत्तरे येत नाहीत. अप्पांकडे याची काही उत्तरे असावीत असे वाटतही नाही. मग इथे गांधीजींची आठवण आल्याशिवाय रहात नाही. महात्मा गांधी एकदा रवीन्द्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात गेले होते. सकाळी सूर्योदयाआधी गांधीजी आणि टागोर फेरफटका मारायला गेले. हलके हलके उजाडू लागलेले होते. झाडांवर पक्षी किलबिलत होतेवाऱ्याच्या मंद झुळुका वाहात होत्या. त्या शांतथंड वातावरणाने सारा आसमंत आनंदी झाल्यासारखा वाटत होता. कविराज त्या वातावरणाने उल्हासित होत गांधीजींना म्हणाले, ‘बापूतुमच्या सत्याग्रहाच्या तत्वज्ञानात पक्षांच्या या गीतांना काय स्थान आहेकाही आहे का?’ महात्म्याने तितक्याच सहजतेने कविराजांना उत्तर दिले, ‘अहो स्थान काय म्हणताहे पक्षांचे गाणे सत्याग्रहाच्या तत्वज्ञानाचे अधिष्ठानच आहे. त्यांच्या गाण्यासाठीच तर ते तत्वज्ञान आहे. फक्त सत्याग्रहाचे तत्वज्ञान पक्षांच्या गाण्यापासून सुरु होत नाही. सकाळी उठून त्यांना मोकळेपणाने गाण्याची तान घ्यावीशी वाटावी यासाठी आदल्या रात्री झोपताना त्यांची पोटे भरलेली असावीत याचीही काळजी सत्याग्रहाचे तत्वज्ञान घेते.’ अप्पांच्या कादंबरीतला प्रसंग मला तीव्रतेने याचीच आठवण करून देतो. वाटमारे नव्या सात्विक जीवनक्रमात टिकतील याची काहीच हमी अप्पा देत नाहीतदेऊ शकत नाहीत.

दास डोंगरी राहातो’ वाचताना ही कादंबरी आहे याचे भान विसरायचे नाही. समर्थांच्या आयुष्याची ही ऐतिहासिक मांडणी नव्हे. हे समर्थांचे अप्पांना भावलेलेअप्पांनी निर्माण केलेले रूप आहे. अप्पांना समर्थ कसे असावेत असे वाटत होते याचे हे दर्शन आहे.या अप्पांच्या मताला ऐतिहासिक आधार कुठे आणि किती हा प्रश्न इथे गैरलागू आहे. हे समर्थ रामदासांचे इतिहासात सिद्ध होणारे रूप नव्हे. मग एक प्रश्न उरतोच. समर्थांचे हे रूप ऐतिहासिक म्हणता येत नाही. अप्पा अनेक गोष्टी जरा जास्तच सोप्या करीत जातात हेही दिसते. तरीही दास डोंगरी राहातो’ मला पुन्हा पुन्हा वाचावाशी का वाटते?

दोन कारणे मला दिसतात. एक कारण असे की कादंबरीत समर्थांचे व्यक्तिमत्व उभे करताना अप्पांनी अपार मेहनतीने जनमानसाची मशागत करणारा’ हे त्यांचे रूप नेमके पकडले आहे. केल्याने होत आहे रेमराठा तितुका मेळवावाउदंड जाहले पाणीशिवरायास आठवावे जीवित तृणवत मानावेजनांचा प्रवाहो चालिला म्हणजे कार्यभाग आटोपलाशाहाणे करून सोडावे सकळ जन’ असे समर्थांचे अनेक उद्गार आपल्याला अगदी लहानपणापासून माहिती असतात. पण त्या सगळ्या विचारांना सामावून घेणारे एक व्यक्तिमत्व अप्पांच्या कादंबरीत आकार घेताना दिसते. आणि हे व्यक्तिमत्व नुसते उपदेश करीत नाही. काय हवे आहे ते सांगताना ते कसे कमवायचेजमवायचे हेही ते सांगतात. रामाचा दास म्हणवणाऱ्या समर्थांनी रामापेक्षा हनुमानाची मंदिरेच जास्त संख्येने उभी केली याचे काहीतरी कारण तर आहेच. शक्तीचा सुयोग्य वापर करणारे आणि बुद्धी वापरून अचूक कार्य साधणारे एक दैवत समर्थांनी मारुतीच्या रूपाने महाराष्ट्राला दिले. हनुमंताची उपासना इतक्या प्रदीर्घ प्रयत्नांनी उभे करण्याचे कारण रामदासां शक्तीचा शोध’ घ्यायचा होता हेच आहे. मराठी संत समाजविन्मुख होते या आक्षेपाला अप्पा इथे एक सणसणीत उत्तर देताना दिसतात. मला हे उत्तर आवडते. आणि हे सगळे प्रयत्न जेव्हा फळाला येत असतातशिवछत्रपती जेव्हा सिंहासनाधीश्वर होत असतात त्या क्षणी मात्र समर्थ तिथे नसतात. समाजाला आपले सर्वस्व देणारा हा अवलिया स्वामी अंतरंगी संपूर्ण निस्संगविरक्त आहे. साऱ्या समाजाचा संसार तो मांडतो. पण असला अप्रूपाचा संसार मांडणारा स्वतः मात्र एकांतप्रिय आहे. धर्मयज्ञाची मुहूर्तमेढ तो रोवतो. पण समारंभाच्या वेळी मात्र दास डोंगरी राहातोयात्रा देवाची पाहातो.समर्थांच्या व्यक्तिमत्वातला हा निस्संग वैराग्याचा हृदयंगम धागाही अप्पांनी अचूक हेरला आहे. मला हे फार आवडते आणि समाधानाचे वाटते.

एक दुसरेही लहानसे कारण आहे. आपल्याला गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या असंख्य गोष्टी या कादंबरीत अप्पा सोपेपणाने मांडतात असे वर म्हटले आहे. आयुष्य हे आपल्याला वाटते तितके गुंतागुंतीचे नाही हा मनाला एक मोठाच दिलासा असतो. अप्पा हा दिलासा फार मोकळेपणाने देतात. आपल्या लेखनाने वाचणाऱ्याला शांत वाटावेदिलासा वाटावा याहून वेगळे अप्पांना तरी काय हवे असणार?


Sunday, 3 June 2018


नव्या अवताराची नवी कथा : कलकी

लेखक का लिहितो (किंवा अधिक भारदस्त भाषेत म्हणजे साहित्यिक साहित्यनिर्मिती का करतो) हा तुमच्या-माझ्यासारख्या जनसामान्यांना नेहमीच सतावणारा प्रश्न आहे. अनेकदा अनेक लेखकांना हा प्रश्न विचारलाही गेला आहे आणि त्याची अनेक उत्तरे अनेकांनी दिली आहेत. ‘मनातली अस्वस्थता जेव्हा असह्य होते, तेव्हा तिला लेखनाद्वारे वाट मिळते’ हे बऱ्याच लेखकांचे म्हणणे आहे. ‘भोवतालच्या कठोर वास्तवाकडे लक्ष वेधणे’ इथपासून ‘सकारात्मक विचारांची प्रेरणा देणे’ इथपर्यंतची उत्तरेही आलेली आहेत. पेशवाईतले कवी मोरोपंत यांनी ‘आपण काही तरावया गावे’ म्हणजे हा दुस्तर भवसागर तरून जाण्यासाठी  उपयोगी असे काहीतरी गावे असे त्यांना वाटत असल्याचे सांगितले आहे. रामकृष्ण मठाने ‘आत्मनो मोक्षार्थं जगद्धिताय च’ असे म्हटले आहे. पण तरीही हे चित्र पूर्ण होत नाहीच. आपले म्हणणे इतरांच्या गळी उतरवण्यासाठी म्हणूनही कधी कधी साहित्य जन्म घेते. जुन्या काळात ‘मुक्तामाला’सारख्या कादंबरीत ‘आमचे म्हणणे सर्वांच्या लक्षात यावे यास्तव एक पूर्वीचा इतिहास सांगतो’ असे म्हणून कथा सांगितली जाई. आता असे न करता थेट कथा सांगून वाचकाला बोध घेण्यासाठी सोडून दिले जाते. मराठीतले ज्येष्ठ कथालेखक जी ए कुलकर्णी यांच्या कथांवर त्या ‘जीएंचे तत्वज्ञान टांगण्यासाठीच्या खुंट्या आहेत’ असा आरोप नेहमीच केला जातो. सहसा अशा साहित्यकृती फारशा वाचनीय होत नाहीत असा अनुभव आहे. पण कधीतरी का होईना, असेही घडते की प्रसारासाठी लिहिलेले असे साहित्य स्वतंत्र लेखन म्हणूनही वाचनीय ठरते. अशा मोजक्या साहित्यकृतींमध्ये आपल्याला स्वामी विज्ञानानंद यांच्या ‘कलकी’चा अंतर्भाव करावा लागेल.
कलकी ही विश्वनाथ ह्या एका सत्शील, मनमिळाऊ माणसाची कथा. या साध्या, सरळ माणसाच्या आयुष्यात अचानक एक वादळ येते. आपली पत्नी आणि रावबहादूर जोशी या धनाढ्य माणसाची कन्या प्रथमा हिचा रावबहादुरांच्या संपत्तीच्या लोभापायी खून केल्याचा आरोप त्याच्यावर येतो. कादंबरी सुरू होते ती खुनाची घटना आणि विश्वनाथचा खटला इथपासून. खून कुणी केला हे विज्ञानानंद सांगत नाहीत. त्याने अशा सर्वनामाने खुन्याचा उल्लेख येतो. एका बाजूला विश्वनाथ आणि त्याचा साडू – प्रथमेच्या बहिणीचा पती – विक्रांत आणि दुसऱ्या बाजूला समाजाची गुन्हे-अन्वेषण यंत्रणा यांचा सामना सुरू होतो. विश्वनाथला विक्रांताचे प्रयत्न ही एकच आशा असते आणि त्याचा बचाव करण्यासाठी विक्रांताने जीव गहाण टाकण्याचेच बाकी ठेवले होते असा निर्वाळा लेखक खटल्याच्या सुरवातीलाच देतात. रावबहादुरांची सर्वात धाकटी मुलगी तृतीया उर्फ तितू हिची संपूर्ण सहानुभूती तिच्या विश्वनाथभैयाच्या बाजूने असते. तिला आपल्या अनुभवाने विश्वनाथ हा खून करणे शक्य नाही ही खात्री असते. आपण खुनी नाही हे न्यायालयाला कसे पटवून द्यायचे हा मोठाच प्रश्न विश्वनाथसमोर असतो. त्याच्या साऱ्या प्रयत्नांनंतरही खटल्याचा निकाल विश्वनाथच्या विरोधात जातो आणि त्याला फाशीची शिक्षा होते. आपण निर्दोष आहोत हे विश्वनाथला माहित आहे आणि ज्या कुणी आपल्या प्राणप्रिय पत्नीचा खून केला त्याला शोधायची (आणि या हत्येचा सूड घेण्याची) त्याला तीव्र तळमळ आहे. पण एकदा न्यायालयात शिक्षेची घोषणा झाल्यानंतर आता हे घडवू शकण्याचा एकच मार्ग विश्वनाथपुढे आहे. पलायन. तेच तो करतो.
जाफर या सराईत गुन्हेगाराच्या मदतीने विश्वनाथ, फाशीसाठी तुरुंगात नेताना, वाटेतच पळ काढतो. मध्येच त्याला पुन्हा पोलिसांच्या स्वाधीन करण्याचाही एक प्रयत्न होतो. पण मरता क्या न करता या अवस्थेत असलेला विश्वनाथ प्रसंगावधान दाखवून या प्रसंगातून सुटतो आणि स्वतःला महापुराने ओसंडून वहाणाऱ्या नर्मदेत झोकून देतो. पुराचा अंदाज चुकून पाण्यात पडलेल्या नर्मदानंद या परिक्रमावासीशी या वाहत्या नदीप्रवासात त्याची गाठ पडते आणि त्याच्याच मदतीने विश्वनाथ नरमांसभक्षक टोळीत पोचतो. इथून विश्वनाथचा जणू नवा जन्म सुरू होतो.
नरमांसभक्षकांच्या टोळीचा राजा जनक याच्या सहवासात विश्वनाथच्या कल्पनाशक्तीला नव्यानव्या विचारांचे अनेक धुमारे फुटतात आणि त्याच्या मनात सूडाची एक अतिशय अभिनव कल्पना जन्म घेते. ही कल्पना म्हणजे सत्यकिरण. विश्वनाथ तपश्चर्येने असे सामर्थ्य मिळवतो की तो ज्याच्या डोळ्याला डोळे भिडवून बोलेल तो माणूस विश्वनाथशी खोटे बोलू शकणार नाही. या नव्या हत्याराचा उपयोग फक्त सूडासाठीच करण्याची प्रतिज्ञा विश्वनाथ घेतो. या तपस्येच्या काळात कठोर शारीरिक श्रमांनी विश्वनाथचे रूपही पालटून जाते. त्यामुळे तो कलकी हे नवे नाव धारण करून आपल्या जीवनमरणाच्या लढ्यात उतरतो आणि अंती यश प्राप्त करतो. या सगळ्या प्रयत्नात त्याला खुन्याचा तर शोध लागतोच. पण आयुष्याचे सार्थक करू शकणाऱ्या सत्याशीही त्याचा परिचय होतो. खुनी कोण असतो आणि विश्वनाथ उर्फ कलकी त्याला न्यायापर्यंत कसा पोचवतो, विश्वनाथला यश मिळेपर्यंत कायकाय झेलावे लागते, या सगळ्या उद्योगात त्याच्या भोवतीचे नेहेमीचे जगच नव्हे तर त्याचे विचारविश्वही कसे उलटेपालटे होऊन जाते आणि प्रौढांच्या मनाच्या काळ्या बाजूशी बालकांच्या निरागसपणाचा सामना होतो तेव्हा काय होते याचे एक छान जमून आलेले दर्शन म्हणजे ही कादंबरी.
या कादंबरीतला नरभक्षकांचा राजा जनक हा विज्ञानानंदांच्या सगळ्या वैचारिक भूमिकेच्या केंद्रस्थानी आहे. विज्ञानानंद त्याच्या रूपाने आपले नवतत्वज्ञान मांडतात. आपले तत्वज्ञान क्रांतिकारी आहे याची स्वामीजींना पुरेपूर खात्री होती. तरीही विरोधाने हे तत्वज्ञान उठून दिसावे यासाठी की काय, पण ते जनकाचे शारीरिक रूप काहींसे ओंगळवाणे वाटेल असे दाखवतात. चिखलातील कमळ किंवा वाळवंटात ओअॅसिस अशासारख्या काही कल्पनांच्या आकर्षणामुळे हे घडते अशी शक्यता दिसते. परंतू त्याचा एक फायदा निश्चितच होतो. जनकाचा सहवासात विश्वनाथमध्ये जे परिवर्तन होत जाते त्यावर वाचकाचे लक्ष पूर्णपणे केंद्रित होते. गंमत म्हणजे विश्वनाथ आणि जनक यांच्या भेटीच्या संपूर्ण काळात जनक एक अवाक्षरही बोलत नाही आणि तरीही विश्वनाथ निष्कर्षांपर्यंत येऊन पोचतो. जनकाच्या फक्त उपस्थितीनेच विचारांचा प्रवाह सुरू होतो असे स्वामीजींचे गृहीतक दिसते. अर्थात हा प्रवाह अधांतरी जन्म घेत नाही. नरभक्षक आदिवासी टोळीतला जनकाचा विश्वासू आणि ज्ञानी शिष्य पीराल याच्याकडून आणि स्वतः जनकाच्या लिखित नोंदी वाचून विश्वनाथने जनकाचे तत्वज्ञान समजून घेतलेलेच असते. त्यामुळे जनकाची विचारांची पद्धत त्याला माहित आहे. तरीही केवळ उपस्थितीने आपल्याच नव्हे तर कुणाचाही विचारप्रवाहाला गती देण्याची जनकाची कुवत आहे असे विश्वनाथलाही वाटते. ज्या तात्विक-सैद्धांतिक विचारांमधून हे सगळे जन्म घेते ते नवतत्वज्ञान आहे तरी काय?
स्वामी विज्ञानानंदांच्या नवतत्वज्ञानाची ओळख करून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की स्वामीजींनी कलकी कादंबरी नवतत्वज्ञानाच्या प्रचारासाठी लिहिली हे खरे. पण जेव्हा ती लिहिली तेव्हा नवतत्वज्ञानाची बाल्यावस्था अजून संपली नव्हती. अजूनही ते घडत-वाढत होते. त्यामुळे सुरवातीच्या काळात कोणत्याही नव्या विचारसरणीत दिसणारे लहान-सहान अंतर्विरोध इथेही दिसतात. एक साधेसे उदाहरण द्यायचे तर सूडाचा आसूड या नवव्या प्रकरणातील पीराल आणि विश्वनाथ यांच्यातल्या नवतत्वज्ञानाबद्दलच्या चर्चेचे देता येईल. चर्चेच्या सुरवातीला पीराल सांगतो की जनकराज चमत्कार मानत नाहीत, तर चमत्कार ही आपल्या अज्ञानाची तत्कालीन मर्यादा मानतात. पाठोपाठ दोनच मिनिटात पीराल सांगतो की ... फार शास्त्रीय चर्चा चालते तेव्हा जनक माझ्या मुखातून बोलायला मदत करतो. पण हा चमत्कारच आहे या विश्वनाथच्या म्हणण्याशी तो सहमत होत नाही. ...रेडिओ आज काय करतो? .... हे .... शक्तीच्या अदलाबदलीचे तत्व आहे. असे पीरालचे म्हणणे आहे. आता इथे अदलाबदल शक्तीची होत नसून व्यक्तीची होते आहे आणि एका व्यक्तीच्या तोंडून दुसराच बोलत आहे हे आपल्याला दिसते आहे. त्यामुळे पीरालचा मुद्दा पटण्यासारखा वाटत नाही. अशाच प्रकारे काही गोष्टींची स्पष्टीकरणेही मिळत नाहीत. तपश्चर्येने सामर्थ्य मिळते हे जगातली सर्वच तत्वज्ञाने मानतात. पण सामर्थ्य कोणते मिळावे हे ठरण्यासाठी सामान्यपणे एखादे दैवत किंवा कुणातरी विवेकी शक्तीची उपस्थिती मान्य केली जाते. ब्रह्मदेव किंवा शंकराकडून वर मिळण्यासाठी तप हे तपश्चर्येचे सर्वसामान्य रूप आहे असे आपण समजतो ते त्यामुळेच. स्वामीजी या कथेत दैवत येऊ देत नाहीत. आता अशा अवस्थेत कशी तपश्चर्या केल्यानंतर कोणते सामर्थ्य (किंवा आपल्या भाषेत ‘वर’) मिळणार हे कसे ठरणार याचे काही उत्तर कादंबरीत नाही. तपश्चर्या करणाऱ्याचा संकल्प हे उत्तर असावे असे कथा वाचताना वाटते खरे. पण समजा एखाद्याचा संकल्प कुणाला त्रास देण्याचा किंवा जगाच्या अकल्याणाचा असेल तर काय हा प्रश्न राहतोच. एखाद्या हिटलरने उद्या ज्यूंच्या विनाशाचा संकल्प घेऊन तपश्चर्या केली तर काय होईल? स्वामीजी कादंबरीत कसलाही खुलासा देत नाहीत. असे काही छोटे छोटे अंतर्विरोध इथे दिसतात. पण सुरवातीच्या काळात हे स्वाभाविक आहे. गाय- एक उपयुक्त पशू असा लेख लिहून तर्कवादी विचारांच्या प्रसारासाठी प्रयत्न करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘संगीत उःशाप’ नाटकात नाटकाच्या शेवटी जातिभेद वाईट हे सांगण्यासाठी साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रकट होतात. असे होत असते. अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे जरा दुर्लक्ष केले तरच नवतत्वज्ञान समजून घेता येईल.
नवतत्वज्ञानाच्या मते जगातली सर्व कारणे आणि परिणाम न्यूटनच्या तिसऱ्या नियमाने मापली गेली आहेत. त्यामुळे कारणेपरिणाम आणि प्रतिकारणेप्रतिपरिणाम यांची एकूण बेरीज शून्यच राहते आणि विश्व स्थिर रहाते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यक्तीसापेक्ष न्याय नवतत्वज्ञानाला मान्य नाही. व्यक्तिनिरपेक्ष आणि भावनांची सरमिसळ न होऊ देता जाणलेले सत्यच नवतत्वज्ञानातल्या न्यायाच्या त्यातल्या त्यात जवळ जाईल. तिसरे महत्वाचे तत्व म्हणजे नवतत्वज्ञान ज्ञान हा गुरु आणि व्यक्तीची विवेकबुद्धी हे निर्णय घेण्याचे साधन मानते. कोणतीही गोष्ट विवेकाच्या कसोटीवरच मान्य किंवा अमान्य केली जावी असे त्याचे म्हणणे आहे. नवतत्वज्ञानात या तीन नियमांना मूलभूत महत्वाचे स्थान आहे. मुख्यतः त्यांच्या पायावरच बाकीच्या तत्वज्ञानाचा डोलारा उभा रहातो. एक उदाहरण जीवनातल्या सुख-दुःखांचे देता येईल. भावनेच्या द्वारा मन हे स्वास्थ्य व सुख यासाठी शरीरावर किंवा तद्-द्वारा जगावर क्रिया करते. त्याची प्रतिक्रिया म्हणून जग शरीराच्याच माध्यमाने अस्वास्थ्य आणि दुःख मनाला परत देते असे नवतत्वज्ञान मानते. याचीच दुसरी बाजू काही विशेष सामर्थ्य किंवा शक्ती हवी असेल तर त्याच्या किंमतीएवढे दुःख स्वीकारले पाहिजे ही आहे.परंतू फायदा आणि त्याची अपरिहार्य किंमत याच्यात काळाचा काही फरक असू शकेल, हे नवतत्वज्ञानाला मान्य आहे.
कथानकाच्या संदर्भात पहायचे तर हे नवतत्वज्ञान पात्रांच्या मार्फतच कथेत यावे लागणार हे उघडच आहे. विश्वनाथच्या नवतत्वज्ञानाच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्वाची असणारी जनक-विश्वनाथ भेट कादंबरीच्या दहाव्या प्रकरणात होते. आधी सांगितल्याप्रमाणे तिची सुरवात स्वामीजी करतात ती जनकाच्या गलिच्छ शारीरिक दर्शनाने. आपण जी प्रतिमा राजपूत किंवा रोमन वीरासारखी रंगवली होती, त्याचे भूतही याच्यापेक्षा बरे सजले असते असे जनकाच्या दर्शनाने विश्वनाथला वाटते. भेटीत संभाषणाची सुरवातही विश्वनाथ करतो आणि शेवटही. या संपूर्ण प्रकरणात जनकराजाच्या तोंडी एकही वाक्य नाही. पण मध्ये मध्ये विश्वनाथला,‘आपल्याला बोलायचे असलेले वाक्य मेंदूच्या आज्ञाकेंद्रात कोणीतरी अडवले आहे असे वाटे असे स्वामीजी लिहितात. हे असे वाटण्याचे कारण विश्वनाथला समजते ते पीरालच्या उदाहरणानेच. पीराल अवघड कल्पना सांगताना डोळे मिटत असे तेव्हा जनकच त्याला आज्ञा देतो आहे असा विश्वनाथला भास होई. या भेटीत त्या भासाचे सत्यतेत रूपांतर होते. पण विश्वनाथसमोर एक फार मोठी अडचण आहे. नवतत्वज्ञान व्यक्तिसापेक्ष न्याय मान्य करीत नाही. त्यामुळे वैयक्तिक सूडही आपोआपच अमान्य झाला. पण सध्या विश्वनाथचे मन फक्त सूडाच्या कल्पनेभोवतीच एकवटले आहे. एकीकडे नवतत्वज्ञानाची चिरेबंदी तार्किक मांडणी नाकारता येत नाही. दुसरीकडे मन सूड पूर्ण झाल्यावाचून ऐकायला तयार नाही. या शृंगापत्तीतून विश्वनाथ अखेरीस एक मधला मार्ग एका वैचारिक प्रवासाद्वारे शोधून काढतो. नवतत्वज्ञान अचानकपणे एका रात्रीत कुणाचे स्वभावपरिवर्तन करण्याचा अट्टाहास करीत नाही. त्यात सावकाशपणाला वाव आहे. एका अर्थाने नवतत्वज्ञानही क्रांतीकारी (revolution) मार्गाने होणाऱ्या बदलांपेक्षा उत्क्रांतीचा  (evolutionचा)  मार्ग अधिक चिरस्थायी असल्याचे स्वीकारते. याचा वापर करून विश्वनाथ एका वेळेपुरती सूड घेण्याची कल्पना मांडतो. नवतत्वज्ञानाच्या पद्धतीने पाहताना जरी हे त्याचे अधःपतन ठरले तरी, मन एका नव्या आयुष्याला सन्मुख करण्याची किंमत म्हणून तो हे स्वीकारतो आहे. स्वामीजींनी विश्वनाथचा हा प्रवास कादंबरीत अतिशय सूक्ष्मतेने आणि सहृदयतेने मांडला आहे.
सूडाच्या या कल्पनेला आणि त्यासाठी करायच्या प्रयत्नांना विश्वनाथ काही मर्यादा घालून घेतो. एक म्हणजे यातना ही किंमत आणि सामर्थ्य हे फळ यांचे परस्पर नाते विश्वनाथ मान्य करतो. या सामर्थ्यातला जो भाग संपत्तीच्या स्वरूपात असेल तो काम झाल्यावर जनकाकडे परत करण्याची तो हमी देतो. दुसरी मर्यादा म्हणजे सूड या उद्दिष्टाला आवश्यक असेल तरच तो असत्य बोलेल. अन्यथा नाही. तिसरी म्हणजे खुनी माणसाला तो न्यायासनापर्यंत नेऊ शकेल. पण स्वतः त्याची हत्या करणार नाही. सत्यकिरण ही कल्पना विश्वनाथला या भेटीतच स्फुरते. ज्या कुणाशी विश्वनाथ नजरेला नजर भिडवून बोलेले तो माणूस त्या वेळी खोटे बोलू शकणार नाही. याचा आपल्याला दिसणारा अर्थ हा आहे की तपश्चर्येने मिळवलेले सामर्थ्य तीन प्रकारचे असणार आहे- शारीरिक, मानसिक आणि आर्थिक. काम झाल्यावर आर्थिक सामर्थ्य पुन्हा जनकाकडे परत करण्याचे विश्वनाथने पत्करले आहे. पण इतर दोन प्रकारच्या सामर्थ्याचे पुढे काय होणार हे स्वामीजी स्पष्ट करत नाहीत.
विश्वनाथाच्या तपश्चर्येला अपेक्षित ते फळ मिळते आणि तो सूडाच्या कामाला सिद्ध होतो. हे सूडसत्राचे कथानक हा या कादंबरीतला सर्वात रंजक, वेगवान आणि पकड घेणारा भाग आहे. तपश्चर्येने विश्वनाथमध्ये जे शारीरिक आणि मानसिक बदल होतात ते योग्य आणि  समर्पक शब्दांमधून स्वामीजी आपल्यापुढे थेट उभे करतात. विश्वनाथ आता कभिन्नकाळा झाला आहे. त्यामुळेच सूडासाठी काम करण्याच्या काळात मुळातली ओळख तो सोडून देतो आणि कलकी हे नवे नाव धारण करतो. स्वामीजी या सर्व घटना अशा पद्धतीने पुढे नेतात की विश्वनाथने मिळवलेले तिन्ही प्रकारचे सामर्थ्य कसाला लागते आणि अखेर विश्वनाथ उर्फ कलकी सूड मिळवण्यात यशस्वी होतो. प्रत्यक्ष आपल्या हाताने एकही हत्या न करता विश्वनाथ सर्व दोषींना न्यायापर्यंत पोचवण्यात यशस्वी होतो. अर्थातच इथला स्वामीजींचा विश्वनाथ हा हिंदी सिनेमाचा हिरो नसल्यामुळे या लढाईत त्याला सुरवातीला काही अडचणी आणि संकटे येतात आणि अपयशाचाही सामना करावा लागतो. विश्वनाथ नवतत्वज्ञानाच्या क्षेत्रात नवा आहे. त्यामुळे त्याला सूडाचा भाव सजग राखणे तुलनेने सोपे जाते. पण आपले मन सांभाळणे हे मात्र महाकठीण ठरते. अर्थातच अखेरीस सत्य विश्वनाथाच्या बाजूला असल्याने तो उद्दिष्ट साधण्यात यशस्वी ठरतो.
सामान्यपणे सूडकथा अपेक्षित कार्य साध्य होण्यासोबतच संपली पाहिजे. पण कलकीमध्ये असे होत नाही आणि इथेच कलकीचे वेगळेपण दिसते. विश्वनाथच्या सूडसत्रातल्या घटना अशा प्रकारे घडत जातात की अपेक्षित परिणाम मिळत असतानाही विश्वनाथ सामर्थ्याचा किंवा यशाचा आनंद घेऊ शकत नाही. एकीकडून मानवी स्वभावाचे सामान्यतः नजरेआडच रहाणारे अनेक पैलू त्याच्या डोळ्यांसमोर येत जातात आणि दुसऱ्या बाजूने नवतत्वज्ञानाचा सर्वात नवा पाईक म्हणून आपल्या स्वतःच्या मानसिक आणि वैचारिक मर्यादाही त्याच्या नजरेसमोर उघड होऊ लागतात. प्रथमेच्या खुनातला एक सहभागी जॉर्ज हा कलकत्त्यात रहात असतो. सूडसत्रातल्या भागीदारांच्या कलकीच्या यादीत जॉर्जचे नाव असतेच. जॉर्जचा उत्कर्ष मुंबईत बेकायदा मोटार व्यवसायांमुळे सुरू होतो. पण त्याचे फळ त्याची वाट पहात शांतपणे उभे असते आणि योग्य वेळी ते जॉर्जच्या भेटीला येते. त्याचे वर्णन करण्यासाठी स्वामीजी जे शब्द वापरतात ते अतिशय चिंतनीय आहेत. ते म्हणतात, ‘आंधळा एक डोळा मागतो तेव्हा देव कधीकधी दोन देतो असे म्हण म्हणते. तिचा उत्तरबिंदू असा आहे, की शिक्षेची वेळ आली की डोळस एक डोळा द्यायला तयार होतो, पण देवाला दोन्ही हवे असतात.’ जॉर्ज याच अनुभवातून जातो. त्याला पोटाचा कॅन्सर तर असतोच. पण मुंबईत सदाशिव नावाचा जॉर्जच्या व्यवहारांना बळी पडलेला एकजण त्याला कलकत्यात गाठतो आणि जशा जॉर्जने त्याला वेदना भोगायला लावल्या तशाच यातना पाठीवर अॅसिड ओतून तो जॉर्जला भोगायला लावू इच्छितो. पण जॉर्जला आपल्या पापांची जाणीव आहे आणि त्याला त्यांचा खराखुरा पश्चात्तापही झाला आहे. त्यामुळे पाठीवर जंबियाने जखम करून आपल्याजवळचे अॅसिड त्यात ओतण्याची इच्छा जेव्हा सदाशिव त्याला सांगतो तेव्हा जॉर्ज सदाशिवसमोर आपली पाठ उघडी करायची तयारी करतो. परंतू जॉर्जचा पश्चात्ताप प्रत्यक्ष डोळ्यांसमोर पाहून कलकी आणि सदाशिव दोघांचाही हात मागे येतो आणि जॉर्ज कॅन्सरने मरण पावतो. स्वामीजी याचे जे सार सांगतात ते असे- ‘सूड घेण्याच्या त्यांच्या भावनेचाच सूड घेतला गेला असे दोघांनाही त्याक्षणी वाटले.’ एका वाक्यात अनेक गोष्टी सांगितल्या जातात आणि नवतत्वज्ञान एक सर्वस्वी नवीन कल्पना आपल्याही मनात घट्ट कोरून ठेवण्यात यशस्वी ठरते. अर्थात सूड आणि न्याय यांच्या स्वामी विज्ञानानंदप्रणित कल्पनांचा कळस यायला अजून अवकाश आहे हेही इथे सूचित केले जाते.
स्वामी विज्ञानानंद यांनी ही कादंबरी स्वतःच प्रवर्तित केलेल्या नवतत्वज्ञानाची पायाभूत वैचारिक भूमिका मांडण्यासाठी लिहिली हे आपण पाहिले. कादंबरी वाचताना वाचकांच्याही ते उघड लक्षात येते. विश्वनाथच्या परिवर्तनाला कारणीभूत असणारे जनकराज कादंबरीत ज्ञानाचे प्रतीक म्हणून येतात. त्यामुळेच विश्वनाथशी झालेल्या संपूर्ण भेटीत ते अवाक्षरही बोलत नाहीत. ज्ञान ही आपण स्वतः ग्रहण करायची वस्तू आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रयत्न हे मुख्यतः इच्छुकाने करायला हवेत हे स्वामी या प्रतीकाद्वारे स्पष्ट करतात. विश्वनाथ हा नवतत्वज्ञानाने परिवर्तित झालेला माणूस आहे. त्याचे स्वभावचित्रण मात्र तो ‘सामान्य’ माणूस आहे असे म्हणू देत नाही. साधारणतः सामान्य माणसांच्यात दिसत नाहीत असे अनेक गुण विश्वनाथमध्ये आहेत. चिकाटी, निग्रह, नैतिकता, जीवनाचे सर्वांगीण आकलन करण्याची क्षमता आणि इच्छा, बौद्धिक उंची, तर्कनिष्ठ तात्विकता असे त्यापैकी काही गुण सहजपणे आपल्या नजरेसमोर येतात. त्यामुळेच मला एक शंका नेहमी सतावते. विश्वनाथचे कलकीमध्ये झालेले परिवर्तन हे इतक्या सहृदयतेने आणि तपशीलाने रंगवता आले त्याचे कारण ते मुळात पु. रा. भिडे या बुद्धिवान गृहस्थांच्या विज्ञानानंद या स्वरूपात झालेल्या परिवर्तनाचेच वाङ्मयीन रूप आहे काय? तसे असेल तर आपल्यालाही या कादंबरीच्या निमित्ताने स्वामी विज्ञानानंदांच्या अंतरंगात आणि त्यांच्या मूळ पुरुषोत्तम भिडे या रूपात जरा डोकावून पाहण्याची संधी मिळते आहे असेच म्हणावे लागेल. विश्वनाथमधल्या परिवर्तनाच्या सर्व पायऱ्या स्वामीजींनी स्वतः अनुभवल्या आहेत. प्रत्यक्षात त्या कदाचित जरा दीर्घकालीन ठरल्या असतील. पण प्रवासाचा आणि प्रवाहाचा वेग कमीअधिक असला तरी त्यातले टप्पे तेच आहेत. एका अर्थाने कलकी ही कादंबरी हे त्यांचे कादंबरीमय आत्मवृत्तच त्यांनी लिहिले आहे.
मूळची कादंबरी ज्यांनी वाचली नसेल त्यांचे वाचनाचे कुतूहल कमी होऊ नये म्हणून काही तपशील मी इथे सांगितलेले नाहीत. रहस्यकथेतला खुनी कोण हे जर आधीच समजले तर संपूर्ण कथा वाचण्यातली गोडी निघून जाते हे खरेच आहे. त्यामुळेच जसे प्रथमेचा खुनी कोण असतो हे मी सांगितलेले नाही तसेच जनकराज मूळचे कोण असतात हे रहस्यही गुप्तच राखलेले आहे. परंतू एक गोष्ट सांगितल्यावाचून गत्यंतरच नाही. कथेतली प्रथमेची सर्वात लहान बहीण तृतीया विश्वनाथ उर्फ कलकीकडून नवतत्वज्ञानाचे पहिले धडे घेते. ती वयाने, अनुभवाने आणि विचारांनी कलकीपेक्षा वेगळी असणे स्वाभाविक आहे. त्याहूनही जास्त महत्वाचे हे आहे की ती तारुण्याच्या ऐन भरात आहे. त्यामुळे नवतत्वज्ञान शिकण्याच्या काळात तिला आधीपासून असणारे विश्वनाथबद्दलचे ममत्व वाढत जाते आणि ते हळूहळू प्रेमामध्ये परिवर्तित होत जाते. उलट विश्वनाथचा सूड पूर्ण झाला असला तरी आपल्यातली अपूर्णता अगदी प्रकर्षाने त्याच्या नजरेसमोर आलेली आहे. तृतीयेचे प्रेम त्याला समजते आहे आणि तिच्याबद्दल आपणही तसाच विचार करतो आहोत अशी शंका त्याला छळते आहे. त्यामुळे आता दुसऱ्यांदा विश्वनाथाला दोन बाजूंनी खेचणाऱ्या दोन प्रेरणांचे संतुलन करण्याची गरज आहे. याशिवाय त्याच्या मनात आणखीही काही वादळे घोंगावत आहेत. त्यावरही त्याला उपाय शोधायचा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे इथून पुढे कोणत्या दिशेने जायचे हे त्याला ठरवायला पाहिजे. कलकीने शोधलेला मार्ग स्वामीजींनी सांगितलाच आहे. कलकी रात्रीच्या वेळी तृतीयेसाठी एक पत्र लिहून तिच्या उशाशी ठेवतो आणि मग मात्र ‘...तो बाहेर पडला. खोलीबाहेर, शहराबाहेर, प्रांताबाहेर आणि – .
कलकी ही स्वामी विज्ञानानंदांनी आत्मचरित्राऐवजी लिहिलेली कादंबरी असेल तर कलकी कादंबरीत जे तत्वज्ञान त्यांनी मांडले तेच त्यांनी जगून दाखवले हे मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही. कादंबरीच्या शेवटी कलकीने तृतीयेला लिहिलेल्या पत्रात स्वामीजी लिहितात ‘जडदेहात संपूर्णाला अपूर्ण रूप येते. अमर्यादाला मर्यादा पडते. ज्याला सत्याचे ज्ञान झाले, त्याने....स्वतःला उंच न्यावे.’ जीवनाच्या अपूर्णतेचा साक्षात्कार झाल्यानंतर आणि सगळेच मोह मायेनेच निर्मिले आहेत हे कळल्यानंतर ज्ञानी मनाने अपूर्णतेचे बंध तोडण्याचा ध्यास घ्यावा यात आश्चर्य मानायचे काहीच कारण नाही. ज्ञानोत्तर कर्म हा भगवद्गीतेबद्दलच्या सर्व चिंतनातला सर्वात जास्त चर्चिला गेलेला भाग आहे. नवतत्वज्ञान हेही अखेर जीवनाचे एक तत्वज्ञान असल्यामुळे हाच प्रश्न त्यालाही पडला तर त्यात काहीच आश्चर्य नाही. जो मार्ग नवतत्वज्ञानाने सांगितला त्यावर मतभेद होऊ शकेल. पण नवतत्वज्ञानाच्या मूलभूत प्रामाणिकपणावर शंका येण्याचे कारण नाही. स्वामी विज्ञानानंदांनीही स्वेच्छेने देह समर्पण करून आयुष्याचा शेवट केला. पण ती आत्महत्या नव्हे. ज्ञानदेवांची संजीवन समाधी, जैन धर्मात घेतले जाणारे संथारा व्रत, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रायोपवेशन या आत्महत्या असू शकत नाहीत. वैफल्य आणि भकासपणा यांचा परिणाम म्हणून होते ती आत्महत्या. तिथे मन खचते, मोडते आणि अखेर पळ काढते. आत्मसमर्पणाची गोष्ट उलट असते. तिथे मन वाढते, विस्तारते आणि शेवटी अधिक मोठे होण्यासाठी शरीराच्या मर्यादाही झुगारून देते. अडचण असते ती तुमच्या-माझ्यासारख्या सामान्यांची. कलकीची पहिली आवृत्ती १९६५ साली निघाली. म्हणजे कादंबरी १९६२-६४ इतकी तरी जुनी असणार. पण तेव्हा स्वामीजी आयुष्याकडे काय नजरेने पाहतात हे आपल्याला पूर्णपणे कळले नाही. अखेर स्वामीजींनी जेव्हा आत्मार्पण केले तेव्हा काय काय घ्यायचे राहून गेले याची जाणीव झाली. सगळ्या गोष्टी होऊन गेल्यावर ज्यांना कळतात ते सामान्य आणि जे नव्या गोष्टी घडवतात तेच असामान्य. आज तरी याला आपल्याकडे काही इलाज नाही.