Tuesday 21 October 2014

निमित्त रोमन हॉलिडेचे
मी रोमन हॉलिडे पहिल्यांदा पाहिला, त्याला आता तीस वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला असेल. मी त्यावेळी कॉलेजमध्ये होतो आणि ऑड्री हेपबर्न हे त्या सिनेमाला जाण्याचं मुख्य आकर्षण होतं. आज तीन दशकांनंतर मात्र या सिनेमाचं आकर्षण बहुपदरी झालं आहे आणि ऑड्रीच्या जोडीला ग्रेगरी पेक, विल्यम वायलर, एडी अल्बर्ट अशा अनेक नावांची त्यात भर पडली आहे. आज माझ्या संग्रही असलेली रोमन हॉलिडेची सीडी हा माझा एक फार अनमोल ठेवा आहे.

रोमन हॉलिडेची कहाणी सरळ सांगता येण्यासारखी आहे. अॅन नावाची एक राजकन्या रोमच्या शासकीय भेटीवर येते. तारुण्याच्या फुलपाखरी वयात असणाऱ्या या मुलीला स्वातंत्र्य आणि मोकळेपणा साद घालत असतो. पण त्याला प्रतिसाद देण्याची तिला परवानगी नसते; कारण राजशिष्टाचार नावाचा तुरुंग चोवीस तास तिच्याभोवती कडेकोट उभा असतो. या सततच्या बंदिवासाला कंटाळून ती रोममध्ये असताना आपल्या महालातून चक्क पलायन करते. पण त्या आधी डॉक्टरांनी तिच्या सततच्या भुणभुणीला कंटाळून तिला झोपेचे औषध दिलेले असते. या इंजेक्शनमुळे आलेल्या गुंगीने ही राजकन्या एका बागेच्या कठड्यावर बसते आणि तिथेच झोपी जाते. तिथे झोपलेल्या तिला ज्यो ब्रॅडले हा अमेरिकन वार्ताहर पाहतो आणि तिचा ठिकाणा जाणण्याचे आणि तिला घरी पोचवण्याचे सर्व प्रयत्न फसल्यामुळे सुरक्षिततेसाठी आपल्या घरी घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी ती झोपेत असतानाच तो आपल्या ऑफिसमध्ये जातो. तिथे त्याला कळते ती एक राजकन्या आहे. अधिकृत बातमी मात्र ती आजारी असल्याची दिली गेली आहे. तिचे बेपत्ता असणे अजून गुप्त राखले आहे हे कळल्यावर एका राजकन्येच्या आयुष्यातला सर्वस्वी अनधिकृत आणि जगाच्या नजरेआड राहिलेला कालखंड आपल्या नजरेसमोर उलगडतो आहे हे त्याला जाणवते. या काळातली तिची छायाचित्रे आपल्याला बख्खळ घबाड मिळवून देऊ शकतील हेही त्याच्या लक्षात येते. ही छायाचित्रे गोळा करण्यासाठी तो आपला मित्र रोडोविच याला हाताशी धरतो. आपली असलियत ज्योला कळलेली आहे ही गोष्ट अॅनच्या मात्र गावीही नाही. त्यामुळे ती खुशाल रोमभर भटकते आणि झडप घालून मिळवलेलं स्वातंत्र्य पुरेपूर उपभोगते. रस्त्यावरचे खाणे, केस कापणे, रोममधली प्रेक्षणीय स्थळे पाहणे अशा साध्या साध्या गोष्टीतला आनंद ती भरपूर लुटते. या भटकंतीच्या काळातच तिचं सौंदर्य, निरागस वागणं, खानदानी संस्कार या गोष्टींकडे आकर्षित होऊन ज्यो हळूहळू अॅनच्या प्रेमात पडत जातो. त्याचवेळी त्याचं शालीन आणि मर्यादशील वागणं, तिच्याबरोबर सर्व रोमभर काय वाटेल ते करत भटकणं, तिला मनमुक्त वागू देतानाही तिची काळजी घेणं, तिचे सर्व हट्ट पुरवण्याची धडपड करणं अशासारख्या गोष्टींमुळे अॅनलाही तो आवडू लागतो. दोघांना एकमेकांसाठी जगण्याची आस वाटू लागते.

पण दरम्यान सरकारनं अॅनच्या शोधासाठी काही खाजगी डिटेक्टीव्ह गुप्तपणे कामावर लावलेले असतात. त्यांना एका क्षणी राजकन्येचा सुगावा लागतो. पाण्याखालून पोहून एका वेळेपुरते त्यांना चुकवण्यात अन आणि ज्यो यशस्वी होतात. पण त्यांना चुकवण्याचा हा अनुभवच त्यांचे डोळे उघडवतो. किती काळ आपण आयुष्यापासून असे पळत रहाणार या विचाराने मनमुराद हिंडणारे त्यांचे पाय जडावतात. रात्री ज्योच्या घरी त्यांचा निर्णय होतो आणि ते एकमेकांपासून दूर जायचे ठरवतात. ज्यो अॅनला तिच्या निवासापाशी आणून सोडतो. एक अखेरचं चुंबन घेऊन दोघेही आपापल्या वाटांनी जातात. भातुकलीतल्या राजा-राणीसारखी त्यांचीही प्रेमकहाणी अर्ध्यावरच संपून जाते.

दुसऱ्या दिवशी आजारातून बरी झालेली अॅन एका अधिकृत पत्रकार परिषदेत उपस्थित होते. ज्यो आपल्या कामाचा भाग म्हणून आपल्या वृत्तपत्रातर्फे तिथे येतो. तिथे दोघेही नजरेनेच एकमेकांचा पुन्हा एकदा निरोप घेतात. रोडोविचने घेतलेले अॅनचे फोटो रोडोविच तिला परत करतो. अॅन तिच्या विश्वात निघून जातो, ज्यो आपल्या आयुष्यात परत येतो.

हिंदी सिनेमा पाहणाऱ्याना ही कथा नवीन वाटणारच नाही. गरीब-श्रीमंत, नोकर-मालक, सताधारी-सामान्य अशा परस्परविरोधी जोड्यांवर हिंदीत आजवर शेकडो सिनेमे येऊन गेले आहेत. क्वचित काही सिनेमांचा शेवटही रोमन हॉलिडेच्या धर्तीचाच होता. प्रेमात विफल होण्याची वेदना हिंदी सिनेमांनी सैगलच्या देवदासच्याही आधीपासून चित्रित केलेली आहे. रोमन हॉलिडेचं मुख्य वैशिष्ट्य आणि वेगळेपण या कथेत नाही तर त्याच्या हाताळणीत आहे, मांडणीत आहे.

या सिनेमाची सारी सूत्रे ज्या विल्यम वायलरच्या हाती होती, त्याने ज्या ताकदीने सिनेमा उभा केला आहे ती ताकदच सिनेमाला अविस्मरणीय करते. याची सुरवात पात्रांच्या निवडी पासूनच होते. ब्रॅडलेच्या भूमिकेत ग्रेगरी पेक आणि अॅनच्या भूमिकेसाठी ऑड्री हेपबर्न ही त्या काळाचा विचार करता खरेतर थोडी हटके निवडच म्हणायला हवी. ग्रेगरी पेक हा  तेव्हाचा  आघाडीचा आणि लोकप्रिय अभिनेता होता. तरी त्याला ही दुय्यम महत्वाची भूमिका वायलरने दिली. पेकने ती स्वीकारली हीच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. त्या मानाने ऑड्री हेपबर्न नवशिकी आणि अद्याप पाय जमवण्यासाठी धडपडणारी अभिनेत्री होती. तरीही तिला चित्रपटातली मध्यवर्ती भूमिका मिळाली. वायलरने लोकप्रियता, प्रतिमा किंवा नावलौकिक यापेक्षा भूमिका आणि कलावंत यांची कुंडली किती जुळते हे पाहून या निवडी केल्या. त्या अचूक ठरल्या. रोडोविचच्या भूमिकेत एडी अल्बर्ट हा गुणी पण त्या मानाने दुर्लक्षित नट शोभून दिसला. भूमिका जिवंत करणे म्हणजे काय हे या त्रिकुटाने पडद्यावर अक्षरशः प्रात्यक्षिक करून दाखवून दिले. हॉटेलमधल्या पार्टीतली धुमश्चक्री या गोष्टीची साक्ष द्यायला पुरेशी आहे. ज्यो, अन आणि रोडोविच या सर्वांचीच स्वतःला विसरून दुसऱ्याला मदत करण्याची आणि त्यांना वाचवण्याची धडपड आणि त्या डिटेक्टीव मंडळींच्या हातून निसटून पळाल्यानंतर अनला झालेला मुक्ततेचा दुप्पट आनंद तिघांनी पडद्यावर अक्षरशः जिवंत करून दाखवला आहे. रोडोविच आणि अॅनच्या पहिल्या भेटीच्या वेळेस ज्यो आपला खोटेपणा अॅनसमोर उघडकीला येऊ नये म्हणून जे काही प्रकार करतो आणि ज्योच्या थापा माहित नसलेला रोडोविच एकाचवेळी रागावतोही आणि गोंधळतोही. हे सारे पडद्यावर प्रत्यक्ष पाहण्यातच खरी मजा आहे.

तिघांचे एकत्रित असे प्रसंग तर इथे अविस्मरणीय झाले आहेतच. पण इतर अनेक छोटे-छोटे प्रसंगही या तिघा कलावंतांनी यादगार करून दिले आहेत. अगदी सुरवातीपासून याची प्रचीती येते. अॅनची सहाय्यिका तिला दुसऱ्या दिवशीच्या कामांची यादी वाचून दाखवत असते. हा सगळा प्रकार कमालीचा कृत्रिम आहे हे ऑड्री नुसत्या चेहऱ्यावरच्या कंटाळ्यातून दाखवत नाही तर अशा प्रसंगी कसं वागायचं याच्या ज्या सूचना तिथे लिहिलेल्या असतात त्या सहाय्यिका वाचत असताना तिच्या बरोबरीने तोंडपाठ म्हणून दाखवते. तिच्या अशा आयुष्यातला सारा कंटाळा आणि साचेबद्ध तोचतोचपणा या एका बोलक्या कृतीतून चटकन जिवंत होतो. दिवसभराचं काम संपवून वेळ घालवण्यासाठी पत्ते खेळत बसणं हा रोडोविच आणि ज्योचा छंद आहे. तिथून बाहेर पडलेल्या ज्योच्या चेहऱ्यावरचे चाललं आहे आपलं रोजच्यासारखं हे भाव बागेच्या कट्ट्यावर झोपलेल्या अॅनला पाहताना आणि तिच्याशी बोलताना ज्या वेगानं बदलत जातात ते खरोखर बघण्यासारखं आहे.

रोमन हॉलिडेच्या कथा-पटकथेची एक वेगळीच चित्तरकथा आहे. या पटकथेचा मूळ लेखक होता जेम्स डाल्टन ट्रंबो. १९४७ मध्ये अमेरिकन संसदेच्या अन-अमेरिकन अॅक्टिव्हिटीज कमिटी नावाच्या समितीसमोर शपथेवर साक्ष देणं त्यानं नाकारलं. त्याची शिक्षा म्हणून जगातल्या सर्वात जुन्या लोकशाहीनं त्याला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर बहिष्कार घातला. पण या गोष्टीनं वायलरपुढे धर्मसंकट उभं राहिलं. चुकीच्या कारणासाठी सिनेमाला प्रसिद्धी मिळणं त्याला नको होतं. पण त्याच्या डोळ्यांसमोर सिनेमाचं जे लोभस रुपडं उभं होतं ते सोडावं आणि एवढी प्रभावी कथा जाऊ द्यावी हेही त्याला रुचेना. अखेर त्यानं या पेचातून बाहेर पडण्यासाठी एक्सोडस आणि स्पार्टाकस या सिनेमांच्या निर्मात्यांनी दाखवून दिलेला मार्गच स्वीकारला आणि कथा-पटकथा यांचं श्रेय मॅकलेलन हंटरला दिलं. पटकथेचं ऑस्करही त्यामुळे हंटरनंच स्वीकारलं. अखेर १९९३ मध्ये अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्सनं अधिकृतपणे या चुकीची दुरुस्ती केली आणि ट्रंबोला मरणोत्तर रोमन हॉलिडेच्या लेखनाचं ऑस्कर बहाल केलं. सिनेमा बनल्यानंतर ४० वर्षांनी लेखकाला पुरस्कार मिळण्याची जगात ही पहिली आणि शेवटची घटना आहे. २००३ मध्ये रोमन हॉलिडेची सीडी बाजारात येताना तिच्या श्रेयनामावलीत ट्रंबो झळकला आणि २०११ मध्ये चित्रपटाशी संबंधित सर्व रेकॉर्डस दुरुस्त करून ट्रंबोचं श्रेय पूर्णपणे त्याला दिलं गेलं.

तर कथा-पटकथा. मूळ कथाही स्वतःची असल्यामुळे असेल, पण डिग्टन-ट्रंबो जोडगोळीनं या सिनेमासाठी एक अगदी रेखीव पटकथा बनवली आहे. पटकथेतून स्वभावचित्रण कसं खुलवावं याचा एक नमुनाच जणू इथे त्यांनी पेश केला आहे. गर्दीचा स्पर्श अनुभवत, वाट काढत रस्त्यातून चालणारी अॅन, ज्योच्या घरातल्या बाथरूममध्ये अॅन असतानाच थेट बाथरूममध्ये सफाईसाठी घुसणारी ज्योची हाऊसकीपर, ज्योनं निक्षून सांगितल्यामुळे काही न कळल्यानं गोंधळलेला पण तरीही ज्योला हवा तसा खांद्यावर बंदूक घेऊन- घराबाहेर पहारा देणारा सिक्युरिटी गार्ड, सुरवातीला आपल्या बॉसशी एका अभूतपूर्व न्यूजस्टोरीसाठी कमालीच्या आत्मविश्वासानं पैज लावणारा आणि शेवटी मी फक्त थट्टा करीत होतो असं त्याच बॉसला सांगून १००० डॉलर्स गमावणारा ज्यो, अॅनच्या नकळत सिगरेट-लायटरच्या आकाराच्या कॅमेऱ्यानं तिचे फोटो घेणारा आणि सिनेमाच्या शेवटी आपल्या चौर्य-कृत्याचा स्वतःच पर्दाफाश करणारा रोडोविच. सिनेमाच्या पहिल्या १५-२० मिनिटात डिग्टन-ट्रंबो ही सारी व्यक्तिमत्वं आपल्यासमोर सघन उभी करतात आणि तिथून सारा सिनेमाच जिवंत होऊन उठतो. सारा चित्रपटभर त्यांनी छोट्या-छोट्या प्रसंगांची खुमासदार पेरणी केली आहे आणि एका हृदयस्पर्शी विषयाची खेळकर मांडणी हा तोल सतत सांभाळला आहे. अगदी सुरवातीला एका गंभीर आणि औपचारिक प्रसंगात अॅनच्या पायातला बूट निसटणं, अॅननं ज्योच्या घरून बाहेर पडल्यावर पुन्हा परत येऊन त्याच्याकडे पैसे मागणं आणि किती पैसे हवेत ते तर मलाही माहित नाही अशी प्रांजळ कबुली देणं, अगदी आपल्याला हवे तसेच केस कापून घेऊन एकट्याच्या मनासारखं वागण्याचा आनंद घेणं, गुच्छातल्या फक्त एका फुलासाठी हातात असणारे सारेच्या सारे पैसे देऊ करणं, अॅन राजकन्या आहे हे माहित नसताना त्याची तिच्याशी असणारी वागणूक आणि सत्य कळल्यानंतर त्याच्या वागण्यात झालेलं परिवर्तन किती प्रसंग आठवावेत! संस्मरणीयता हा या पटकथेचा जणू एक अंगभूत गुणधर्मच आहे.

वायलरची प्रसंगांची मांडणी आणि त्याचा कॅमेरा यांचा या सिनेमात अत्यंत महत्वाचा वाटा आहे. कॅमेरामन हेन्री अलकेन आणि फ्रांझ प्लॅनर यांनी हातातला कॅमेरा अगदी वायलरला हवा तसा बोलका करून दाखवला आहे. रोमच्या महत्वाच्या स्थळांची जी सफर हा कॅमेरा प्रेक्षकांना घडवतो ती तर अतिशय प्रेक्षणीय आहेच. पण प्रसंगांचा जो तोल या त्रयीनं इथे कॅमेऱ्याच्या माध्यमातून उभा केला आहे त्याचा प्रत्यय प्रत्यक्ष चित्रदर्शनातूनच येऊ शकेल. सिनेमाच्या शेवटच्या पत्रकार परिषदेच्या प्रसंगात अॅन आत निघून गेल्यानंतर ज्यो परत फिरतो आणि त्या दालनातून बाहेर पडतो. वायलरनं बॅकवर्ड-मूव्हिंग-अँड-ट्रॅकिंग पद्धतीनं हा शॉट घेतलाय. त्यामुळे पडद्यावर तो पाहताना ज्यो आपल्या आयुष्यात परत निघालाय हे तर कळतंच. पण त्याच्या प्रत्येक पावलासरशी अॅनचं जग ज्योच्या जगापासून दूरदूर चाललंय असा जो परिणाम वायलर साधतो तो खरोखर मनाला चटका लावून जातो. रंगीत नसूनही हा सिनेमा आजही देखणा वाटतो त्यात या कॅमेऱ्याचा फार मोठा वाटा आहे.

मी हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला तेव्हा फार काही कळण्याचं वय नव्हतंच. पण तरीही या सिनेमाचा परिणाम कुठेतरी फार खोलवर गेला होता. त्यानंतरच्या गेल्या तीस वर्षांत मात्र या चित्रपटानं प्रश्नांचं अक्षरशः मोहोळ उठवून दिलेलं आहे आणि ते कुठेही कमी होण्याची कसलीही चिन्हे दिसत नाही आहेत. आपल्या हिंदी सिनेमाने या प्रश्नाला अतिशय ढोबळ आणि बटबटीत रूप दिले आहे. तेही एकवेळ क्षम्य म्हणता आलं असतं. पण बहुतेक वेळा शक्य तितक्या लवकर प्रश्नातून पळ काढण्याचा आपला प्रयत्न असतो. सजनी अमीर - साजन गरीब किंवा साजन अमीर - सजनी गरीब अशा पद्धतीनं आपण कथेची सुरवात करतो. त्यात पहिल्या पर्यायाकडे आपला कल जरा जास्त. (कदाचित स्त्री नामक देवीला ऐहिकाचा त्याग करायला लावणं सोपं जात असावं, म्हणून?) आणि मग बहुतेक वेळा दो दिलों के बीच उभी राहिलेली चांदी-सोने की दीवार हे दोघे प्रेमी चाहत की ताकतपर तोडून जातात. पुलंनी बहुधा आपल्या या ठोकळेबाजपणाला उद्देशूनच सुखांतची व्याख्या सुखाचा अंत अशी केली आहे. प्रत्यक्ष आयुष्याला आणि त्यातही जडणघडणीच्या काळात तोंडही न पाहिलेल्या खऱ्या अडचणींना हे बहाद्दर प्रेमी सिनेमाचा सुखी द एंड झाल्यावर कसे तोंड देणार याचं उत्तर आपण कधीच देत नाही. राकेश रोशन सारखे महाधूर्त निर्माते तर एका घोटात अगस्तीनं सारा समुद्र प्यावा तसा हा सारा प्रश्न एका घोटात पिऊन टाकतात. मग त्यांच्या कहो ना प्यार है मध्ये, रोहितच्या प्रेमात आकंठ बुडालेली नायिका प्रियकराच्या सब काम मै ही करूंगा, या तुम भी कुछ करोगी या प्रश्नाला करूंगी ना! तुम्हारे हाथसे खाऊँगीअसे उत्तर देते. पण मध्यंतरापर्यंत येता येता स्वतःच्या हाताने आग जलानेवाला आणि खाना पकानेवाला रोहित सिनेमातून एक्झिटच घेतो आणि त्याच्या जागी त्याच्याच चेहऱ्या-मोहऱ्याचा पण अगदी गर्भश्रीमंत असणारा राज येतो. त्यामुळे ही गरीब-अमीर जोडी पाहून तुम्हा-आम्हाला पडलेला हे नायक-नायिका जगणार कसे? हा प्रश्न मुळापासून पुरा छाटला जातो आणि गरिबीच्या चेहऱ्यावर श्रीमंतीचं आरोपण होतं. आम्ही प्रश्नच मुळात इतका तकलादू करून ठेवल्यावर आमचं उत्तर कुचकामी ठरावं यात काय आश्चर्य आहे? त्यामुळे एतद्देशीय सिनेमाकडून उत्तराची तर सोडाच, पण प्रश्नाच्या धड मांडणीचीही कुणी अपेक्षा करत नाही. प्रश्नाचं मोहोळ दुसऱ्याच दिशेनं भिरभिरत येत असतं.

या चित्रपटात एक प्रसंग आहे. केस कापून रूप बदललेली अॅन एका पार्टीत सुखाने गात, नाचत असते. सरकारने नेमलेल्या डिटेक्टीव्हजपैकी दोघे तिथे तिला पाहतात आणि तिला ओळखतात. तिला ते सोबत नृत्य करण्यासाठी बोलावतात आणि नृत्य करता करता तिला आपण ओळखल्याचं सांगून परत चलायला  सांगतात. अॅन अर्थातच ते नाकारते. त्यावर ते लोक तिला जबरदस्तीनं परत नेण्याचा प्रयत्न करतात. अॅन प्रतिकार करते, रोडोविच आणि ज्यो तिला मदत करतात. एका फिल्मी स्टाईल धूमधमाल हातघाईनंतर ज्यो आणि कंपनी पाण्यात उड्या टाकतात, पाण्याखालून पोहत दुसरीकडे बाहेर निघतात आणि पळून जाण्यात यशस्वी होतात.

मला हा प्रसंग पडद्यावर पाहताना तेव्हाही त्या डिटेक्टीव्हजनी इतका या लोकांचा पिच्छा पुरवणं पटलं नव्हतं. कदाचित तेव्हा तारुण्यासुलभ भावनेतून अॅन आणि ज्योचाच नेहमी विजय व्हावा असे वाटत असणे शक्य आहे. पण मग आज पन्नाशीत ते न आवडणं जास्त धारदार का झालं आहे? त्या डिटेक्टिव्ह मंडळींवर शासनानं राजकन्येला शोधण्याचं काम सोपवलं आहे, तिला पळवून आणायचं नव्हे. त्यामुळे त्यांनी तिचा शोध घ्यावा आणि पत्ता लागल्यावर आपल्या कामाचा अहवाल सरकारला सादर करून बाजूला व्हावं. तिच्या आयुष्यात अशी हुकमी ढवळाढवळ करण्याचा त्यांना काही अधिकार नाही असं वाटायचं. हे वाटणं तीस वर्षांपूर्वीचं आहे. आज तर प्रसिद्ध लोकांच्या पूर्णपणे खाजगी आयुष्यात खुशाल, बेधडक दखलंदाजी करणाऱ्यांची अख्खी फौजच्या फौज तयार झाली आहे. पूर्वी याला सत्ता शासन पोलीस अशी नावं होती, आज त्याला मीडीया असं नाव आहे. मीडियावाल्यांच्या या   सततच्या ससेमिऱ्यानं आपल्या आयुष्यातल्या कांही खऱ्याखुऱ्या शोकांतिकांना जन्म दिला आहे. त्यातल्या ज्या कथेचं गारूड आजही आपल्या मनावरून उतरलेलं नाही ती शोककथा म्हणजे प्रिन्सेस डायना. तिचा विवाह ब्रिटनच्या राजपुत्राशी झाला होता, तो तिथला भावी राजा होता, त्याचं आयुष्य लोकांसाठी असणार, डायनाला हे लग्नाआधीच माहित होतं, एक उच्चपदस्थ नेहमीच लक्षवेधक असणार, चार्ल्सशी जमेनासं झाल्यावर डायनाची प्रतिक्रिया बालिश, अपरिपक्व आणि संयम नावाच्या गुणापासून कोसोगणती दूर अशीच होती हे सारे आक्षेप मला माहीत आहेत आणि मान्यही आहेत. मला पडणारा प्रश्न फक्त एकच आहे- डायनाचा ज्या पद्धतीनं सतत माग काढण्याचा प्रयत्न झाला तो पाहता प्रश्न अधिकाधिक फणा काढतोय. एका उच्चपदस्थ, अपरिपक्व, उतावळ्या, पदाला न शोभणाऱ्या (सरळ मूर्ख म्हणूया का?) पण सुंदर स्त्रीला तिचं नवऱ्याशी पटत नसेल तर ते दुःख एकांतात आपल्या मित्राबरोबर वाटण्याचं स्वातंत्र्य असावं की नसावं? नसावं तर कुणीकुणी तिच्या एकांतात घुसावं? तिच्या मित्राबरोबर चार भिंतीआड तिनं जपलेली तिची नाती चक्क चव्हाट्यावर आणणे कोणत्या सामाजिक नीतिमत्तेत बसतं? या प्रकरणात तिच्या नवऱ्याचा संबंध आहे हे मान्य व्हायला हरकत नाही, पण बाकी कुणाला यात डोकवायचा काय हक्क आहे? थेट कायदे मोडून माझ्या एकांतात कुणी डोकावू नये एवढी अपेक्षा करण्याचाही तिला अधिकार नसावा का? डायनाच्या मानवी हक्कांची अशी पायमल्ली का म्हणून व्हावी?

रोमन हॉलिडेवर हे प्रश्न चपखलपणे कलम करता येतात. समजा अॅननं ज्योसमवेत एका गुप्त स्थळी दडी मारली, तर शासकीय यंत्रणा आणि त्याहीपेक्षा मीडिया त्यांच्या त्या गुप्त स्थानापर्यंत माग काढून थांबेल का? का जमीन आणि दरवाजा यांतल्या फटी, दरवाजाची की होल्स, खिडकीच्या झडपा यांसारख्या जागी सूक्ष्म, छुपे कॅमेरे लावून त्यांच्या एकांताचा या मंडळींनी बाजार मांडला असता? दुसरी शक्यताच जास्त वाटते ना? पण असा बाजार मांडण्याचा या मंडळींना काय अधिकार आहे? सुसंस्कृतपणाच्या कोणत्या व्याख्येत हे सर्व बसतं? आणि अशा धश्चोटपणाचा त्याच पातळीवर उतरून प्रतिकार करू पाहणाऱ्या साऱ्या सेलेब्रिटीजना देवयानी चौबळसारखे मीडियावंत खुनशी, आक्रमक हल्लेखोर ठरवणार! उलटा चोर कोतवालको डांटे? वा रे न्याय!

मुळात अशी साहसे करायला आणि वेळप्रसंगी न्याय-नीतीचीच नव्हे तर कायद्याचीही पर्वा न करायला मिडीया तयार होतो ते या मालमसाल्याला भरगच्च गिऱ्हाईक मिळेल ही खात्री त्यांना पूर्णपणे असते म्हणून. मग जे तुम्ही-आम्ही या मालाचं गिऱ्हाईक असतो त्यांचीही मानसिकता नेमकी काय असते आणि वेळप्रसंगी अशा क्रौर्याच्या पातळीवर जाण्याइतकी ती हीन का होते? आपला सारा सुसंस्कृतपणा हा फक्त एक बुरखाच असतो, बुरख्याच्या आत आपण कुठल्याही कारणासाठी लढाई हाच एक मार्ग माहीत असलेले, सर्वात उत्क्रांत असलेले पशूच असतो आणि लढाईत तर सगळंच क्षम्य असतं असं आपण मानतो असा आपल्या वागण्यावरून जर कुणी निष्कर्ष काढला तर आपण त्यावर काय बोलणार आहोत आणि त्याविरुद्ध कोणता युक्तिवाद करणार आहोत?

अर्थात हा प्रश्न विचारल्यानंतरही या कथेबद्दलची हळहळ संपून जात नाही. उच्चपदस्थांच्या किंवा सिलेब्रिटींच्या आयुष्याला पडणाऱ्या या मर्यादा एक सामाजिक वास्तव म्हणून मान्य केल्यानंतरसुद्धा सिनेमाचा हा एकच शेवट शक्य होता का हे खात्रीनं सांगता येत नाही. हा प्रश्न पहिल्यांदा पडण्याच्या वयात फारशी माहितीही नव्हती. त्यामुळे हाच शेवट आवश्यक नाही असं वाटायचं. पण हे वाटणं कुणाच्या डोक्यावर देता येईल हे कळायचं नाही. नंतर कालांतरानं असं एक मस्तक गवसलं आणि त्या कथेपुढं आपसूकच आदरानं मान लवली. त्या माथ्याच्या मालकाचं नाव आहे इंग्लंडचा राजा आठवा एडवर्ड. १८९४च्या जूनमध्ये जन्मलेला एडवर्ड २० जानेवारी १९३६ला राजा झाला आणि काही दिवसातच तो इंग्लंडचा सर्वात वादग्रस्त राजा ठरला. एक घटस्फोटित अमेरिकन महिला वॉलिस सिंपसन हिच्याशी विवाह करायचा निर्णय त्यानं घेतला आणि देशभर एकच वादळ उठलं. ब्रिटीश कायद्यात कुठेही राजाला घटस्फोटित किंवा ब्रिटीश नसलेल्या महिलेशी लग्न करायला प्रतिबंध नाही. पण इंग्लंडचे त्यावेळचे पंतप्रधान बाल्डविन यांनी अशी भूमिका घातली की ब्रिटीश जनता या महिलेला राणी म्हणून स्वीकारायला कदापि तयार होणार नाही. राजानं ठरवल्याप्रमाणे हा विवाह तडीला नेलाच तर मंत्रीमंडळाचा राजीनामा सादर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि एडवर्डला कळून चुकलं की या परिस्थितीत राजघराण्याच्या अंतर्गत प्रश्नावरून पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील आणि राजाचं तटस्थ स्थान नष्ट होईल. त्यानं या प्रश्नावर दीर्घ विचार केला आणि राजाचं तटस्थ स्थान राखण्याचा निर्णय घेतला. ११ डिसेंबर १९३६ ला त्यानं राजसिंहासनाचा त्याग केला आणि मगच श्रीमती सिंपसनशी विवाह केला. याचा अर्थ असा की अवघे ३२५ दिवस राजा म्हणून काढल्यावर उर्वरित आयुष्य त्यानं निवृत्त पद्धतीनं घालवलं. २८ मे १९७२ ला तो मरण पावला म्हणजे त्याच्या सेवानिवृत्तीचा काळ होता ३५ वर्षे साडेचार महिने. त्यापैकी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सुमारे चार वर्षे त्याला फ्रान्समधल्या मोहिमेत आणि बहामाचा गव्हर्नर म्हणून काम करण्यास सांगीतलं गेलं तर साडेएकतीस वर्षे राजाचा औरस पुत्र आणि ब्रिटीश राज्याचा निष्कलंक वारस असलेल्या या गृहस्थानं एक सामान्य आयुष्य घालवलं. आपल्या प्रेमाशी एकनिष्ठ रहाण्याची एवढी जबर किंमत या प्रेमवीरानं चुकवली. (कँमिला पार्करच्या आकंठ प्रेमात असताना डायनाशी लग्न करणारा आणि लग्नानंतर पत्नीला महालात कोंडून स्वतः प्रेमपात्राबरोबर हिंडणारा चार्ल्स हा बहुधा या एडवर्डचा विरुद्धार्थी शब्द असावा.)

केवळ आपल्या देशापुरतं पाहायचं तर मग एवढा इंग्लंडपर्यंतचा प्रवास करण्याचीही काही गरज नाही. आपल्याच देशातल्या एका राजघराण्याचा औरस वारस एका सामान्य स्त्रीच्या प्रेमात पडला. दोघांना जोडणारा समान धागा होता संगीताचा. पण राजघराणं तर शेवटी राजघराणंच असतं! तख्तनशीन राजानं आपल्या मुलाच्या प्रेमाच्या विरोधात उभे रहाण्याचा निर्णय त्याला ऐकवला. थेट बापाच्या पावलावर पाऊल ठेवत मुलानं आपला, या सामान्य गाणारणीशी विवाह करण्याचा, निर्णय कायम ठेवला आणि त्यासाठी राजघराण्याचाच नव्हे तर राज्याचाही त्याग केला. एका तुलनेनं साध्याशा घरात सारा जन्म घालवतानाही तुम्हा-आम्हाला चिरतरुण सुरांनी न्हाऊ घालण्याचं आपलं व्रत त्यानं आजन्म सांभाळलं आणि आपल्या मुलाला गाण्याचा हा वारसा सोपवूनच त्यानं जगाचा निरोप घेतला. आपल्यालाच नव्हे तर हिन्दी सिनेमा पाहिला जातो अशा सर्व ठिकाणी हा संगीतकार चांगला माहित आहे- सचिनदेव बर्मन!

त्यामुळेच सचिनदादा आणि एडवर्ड यांच्यापुढे आदरानं नम्र होतानाही अॅनला हे खरोखरच शक्य नव्हतं का हा प्रश्न माझ्या मनासमोरून हलत नाही. ती अद्याप तरी राणी झाली नव्हती, ज्यो हा अमेरिकन असल्यामुळे अॅनला त्याच्यापर्यंत पोचायला कोणतीही आडकाठी नव्हती, सिनेमा स्पष्टपणे तसं सांगत नाही- पण अॅनचा मायदेश हा युरोपातला एखादा छोटासाच देश असावा. तिथे या विचाराला प्रतिकार होणार तरी किती? मग तिने का नाही केलं हे? कर्तव्यभावना, मोह की दोन्ही? यावर तिला मार्ग सापडलाच नसता का? समजा, तिनं मला ज्यो शी संसार मांडायचा आहे. तुम्हाला हे मान्य नसेल, तर मी राजघराण्याचा आणि त्याबरोबर येणाऱ्या प्रतिष्ठा, आदर आणि संपत्तीचा त्याग करायला तयार आहे हे आपल्या लोकांना सरळ सांगितलं असतं तर तिला बाल्डविन आणि ब्रिटीश जनतेसारखाच प्रतिसाद मिळाला असता का? मग आपण अनुभवांनी शहाणे होतो म्हणजे नेमकं काय? हे असं का असतं? का असावं? प्रश्न, प्रश्न आणि आणखी प्रश्न!

पुढे या प्रश्नांमध्ये आणखी एक प्रश्न येऊन मिळाला. अॅनबरोबरचे दोन दिवस हे ज्यो च्या आयुष्यातले मंतरलेले दिवस होते. अवघ्या दोन दिवसात तिला फोटोंमध्ये कैद करून एक बख्खळ पैसा मिळवून देणारी भक्कम स्टोरी बनवावी इथपासून तिच्या प्रेमानं भारलेल्या एका क्षणापुढे बाकी सारं काही तुच्छ आहे इथपर्यंत त्याचा प्रवास झाला आहे. संस्कारांची ही दिशा टिपिकल अमेरिकन म्हणून ओळखली जाते ती नाही. ती जास्त प्रमाणात नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा तुझी दूरता त्याहुनी साहवे असं म्हणणाऱ्या पृथ्वीच्या जातकुळीशी नातं सांगणारी आहे. पण एकदा या उंचीला पोचलेल्या ज्यो ला उद्यापासून वृत्तसंस्थेच्या कचेरीत त्याच्या त्या टकल्या बॉससमोर उभं राहून पुन्हा एकदा उथळ सेलेब्रिटीज आणि भंपक नेत्यांच्या कार्यक्रमांचे वृत्तांत बनवावे लागतील तेव्हा तो काय करणार आहे? त्याचं मन आता यात रमेल का? आपली सारी उंची गमावून पुन्हा एकदा याच चिखलात उतरणं त्याच्या मनाला आज रुचेल का? जमेल का? चार्ल्स डिकन्सनं ए टेल ऑफ टू सिटीज सारख्या भव्योदात्त शोकांतिकेत या प्रश्नाचं एक उत्तर देऊन ठेवलं आहे. आयुष्यात अशा उंचीला पोचण्याचा क्षण हा त्या क्षुद्र मानवाच्या मृत्यूचा क्षण असणं हेच योग्य असतं. त्यामुळे डिकन्सचा सिडने कार्टन येशू ख्रिस्ताच्या उंचीला क्षणभर स्पर्श करतो आणि त्याच वेळी आपली मान गिलोटिनखाली देतो. जणू फ्रेंच राज्यक्रांतीतल्या सर्वसामान्य मानवांच्या असामान्य क्रौर्यासाठी पुन्हा एकदा एक येशू सुळावर बलिदान करतो, साऱ्या मानवजातीचं हे पाप आपल्या शिरावर घेऊन!

सिडने कार्टन ही काल्पनिक व्यक्ती आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करावं तर अर्नेस्ट हेमिंग्वे त्याच्या पिस्तुलाच्या नळीसकट समोर येऊन उभा राहतो. फेअरवेल टू आर्म्स, फॉर हूम द बेल टोल्स, आणि द ओल्ड मॅन अँड द सीचा हा महालेखक कंपवाताच्या विकारामुळे उत्कट उंचीवर विहरणारं मन दुर्बल शरीरात जखडलं जातंय हे फार काळ सहन करू शकत नाही. स्वतःचंच पिस्तुल स्वतःच्या डोक्यात रिकामं करून तो देहाचा हा बंध कायमसाठीच तोडून टाकतो. मला या गोष्टीची विलक्षण भीती आणि काळजी वाटते- उद्या ज्यो ब्रॅडलेही सिडने कार्टन आणि पपा हेमिंग्वेच्या वाटेनं जाणार नाही ना? रोमन हॉलिडेची खरी आणि  अखेरची शोकांतिका पडद्यावर दिसणाऱ्या सिनेमाचा शेवट झाल्यानंतर तर होणार नाही?


चांगल्या सिनेमाचे माझे काही निकष आहेत. एखादा प्रश्न किंवा एखादी लक्ष्यवेधक घटना किंवा एक जगावेगळी व्यक्ती सर्व कंगोऱ्या-बारकाव्यांसहित आपल्या डोळ्यांसमोर साक्षातच उभी करणारा सिनेमा अभिजात म्हणावा लागेल हे निर्विवाद आहे. पण जो सिनेमा समोर दिसतो त्यापेक्षा जास्त मोठा होतो, आपल्या मनात संस्कृतीविषयीच्या प्रश्नांचं एक वादळ उठवतो आणि सर्व आयुष्यभर ते वादळ घोंघावतच राहील, त्याची व्याप्ती वाढत वाढतच जाईल आणि त्याची अस्वस्थता कधी कधी झोप उडवून देईल एवढं सारं घडवून आणतो तो सिनेमाही खराच अभिजात असतो याबद्दल माझ्या मनात तरी काहीही शंका नाही. मग रोमन हॉलिडेला मी अभिजात नाही तर काय म्हणू?

Thursday 2 October 2014

खरा अजेंडा हिंदुत्वहाच!
Apr 15, 2014, 03.53AM IST

डॉ. भालचंद्र मुणगेकर, राज्यसभा खासदार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशानुसार भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर ते संसदीय लोकशाही झुगारून अध्यक्षीय लोकशाहीचे संकेत असल्याचा ऊहापोह होत असला, तरी प्रत्यक्षात त्याचा प्रवास हुकूमशाही किंवा फॅसिझमकडे कसा वेगाने सुरू झाला आहे, त्याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा...

मॅथ्यु एन. लीऑस या विचारवंताने फॅसिझमची सर्वसाधारपणे पुढीलप्रमाणे लक्षणं सांगितली आहेतः अति उजवी आर्थिक आणि सामाजिक-राजकीय विचारसरणी, राष्ट्राव्यतिरिक्त बाकी सर्व निष्ठा दुय्यम, राष्ट्राचा पुनर्जन्म किंवा पुनरुत्थान, समाजात एकजिनसीपणा निर्माण करण्यासाठी 'परक्या' सांस्कृतिक-वांशिक-धार्मिक समूहांचा निःपात, लोकांना भावनिक आवाहन करून उद्दीपित करणं, प्रत्येक बाबतीत फक्त आपणच लोकांची इच्छा व्यक्त करतो असा दावा, सर्वंकष सत्ता हातात केंन्द्रित झालेला एकच सर्वोच्च नेता, सगळ्या संघटनांच्या माध्यमाद्वारे सत्ता हस्तगत करणे, आवश्यक तेव्हा हिंसेचा अवलंब करणे आणि सर्व प्रकारचा विरोध दडपशाहीने/ हिंसेने मोडून काढणे अशी ती लक्षणं आहेत.

आज राष्ट्रवादाची मक्तेदारी सांगणाऱ्या रा. स्व. संघ परिवाराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि गांधीजींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाहीच, उलट हिंदू राष्ट्रवादाच्या संकुचित संकल्पनेने छेद देऊन सर्वसमावेशक 'भारतीय राष्ट्रवादाला' विरोधच केला. ज्यांनी गोळवलकरांची 'विधान' 'आम्ही किंवा आमची राष्ट्रवादाची कल्पना' आणि सावरकरांचे 'हिंदुत्व' ही पुस्तके वाचली असतील, त्यांना हिंदू राष्ट्रवादाची चार मुख्य लक्षणे ध्यानात येतील. त्यानुसार पहिले, भारत हे अनादी काळापासून हिंदूराष्ट्र म्हणून अस्तित्वात आहे. (प्रत्यक्षात राष्ट्र ही संकल्पना सतराव्या शतकात प्रथम युरोपमध्ये अस्तित्वत आली). दुसरे लक्षण, एकचालकानुवर्तित्व म्हणजे एका व्यक्तीच्या हातात सर्व प्रकारच्या सत्तेचे केंद्रीकरण करणे. तिसरे, संसदीय किंवा कोणत्याही प्रकारच्या लोकशाहीला आणि समाजवादी विचारसरणीला विरोध. चौथे, गोळवलकर आणि सावरकर या दोघांच्याही मते, व्यक्तीला राष्ट्रीयत्व प्राप्त करण्यासाठी मातृभूमीबरोबरच पितृभूमी आणि पूज्यभूमी असली पाहिजे. या शेवटच्या निकषानुसार संघ-सावरकरांच्या हिंदू राष्ट्रवादाच्या संकल्पनेत या देशातील मुस्लिम आणि ख्रिश्चन बसत नाहीत.

उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाहीला सरळ छेद देणारा संघ परिवाराचा महत्वाचा प्रयोग म्हणजे १९८९चा रामजन्मभूमीचा वाद. लालकृष्ण अडवाणींनी आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करून राम जन्मभूमीचा प्रश्न उपस्थित केला. सर्वसामान्य हिंदूंच्या भावनेला हात घालून अयोध्येतील सुमारे ४५० वर्षांची जुनी बाबरी मशीद उध्वस्त केली गेली. ते व्यापक आणि सर्वसमावेशक भारतीय राष्ट्रवादाला दिलेले एक आव्हान होते आणि आहे. दुसरीकडे परिवाराने राम जन्मभूमी प्रकरणाला लोकशाही प्रक्रियेत बसवून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. यातूनच १९९९ साली सत्ता आल्यानंतर आक्रमक हिंदू राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते अडवाणी यांना तूर्तास बाजूला करून 'एनडीए'ची मोट बांधण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या सर्वमान्य नेत्याला पंतप्रधानपदी बसविले. कदाचित लोकशाही प्रक्रियेमध्ये आपली चौकट घट्ट करण्याची ही संधी मानून संघपरिवाराने आपले एक पाऊल मागे घेतले.

पुढे हिंदू राष्ट्रवादाची सैल झालेली पकड आणि सत्तेवरून पायउतार व्हावे लागण्याचा दुहेरी फटका संघाला बसला. २००४ ते २०१० पर्यंत भाजप आणि एकूणच संघपरिवार अंतर्मुख राहिला. मात्र याच वेळी गुजरातमध्ये मोदी नावाचे नवीन रसायन तयार होत होते. आपले राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी मोदींमध्ये असल्याची गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात रा. स्व. संघाची खात्री पटत गेली. त्यामुळे अत्यंत जाणीवपूर्वक सर्व मार्गांनी संघाने मोदींचे देशव्यापी नेतृत्व उभे करण्याची मोहीम सुरू केली.

सर्वप्रथम मोदींचे प्रत्यक्षात नसलेले गुजरातचे आभासी 'विकासाचे मॉडेल' निर्माण करून मोदी म्हणजे 'विकास पुरुष' अशी प्रतिमा निर्माण केली. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातला विकासाची प्रदीर्घ परंपरा असल्याचे ध्यानात घेतले, तर इतर काही मागासलेल्या राज्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोदींपेक्षा उत्तम कामगिरी केली आहे. मोदींच्या या तथाकथित विकासाच्या मॉडेलवर टीका झाल्यानंतर मोदी म्हणजे खंबीर आणि उत्तम प्रशासक असे चित्र उभे करून त्यांना 'छोटे सरदार' असे संबोधण्यात येऊ लागले आणि त्यांच्यासारख्या खंबीर प्रशासकाची देशाला गरज आहे अशी हवा पसरवली. त्यासाठी संघ परिवारातील सर्व संघटनांनी संबंध देशभरच नव्हे, तर जागतिक पातळीवर एक जबरदस्त नेटवर्किंग सुरू केले. या सर्व प्रक्रियेत कॉर्पोरेट सेक्टरमधील बड्या लोकांनी आणि सोशल मीडियाने फार मोठी भूमिका बजावली. आता देशाला फक्त मोदीच वाचवू शकतात असे वातावरण निर्माण करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर भाजपअंतर्गत दुफळी असतानाही संघाच्या आदेशानुसार मोदींना प्रथम लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचे प्रमुख आणि नंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. संघाच्या पाठिंब्याने मोदींनी सुरुवातीपासूनच अडवाणी, सुषमा स्वराज, जसवंत सिंग, यशवंत सिन्हा, मुरली मनोहर जोशी इ. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण केले.

गुजरातेत सत्तेवर आल्यापासून मोदी यांनी स्वतःचा एकछत्री अंमल प्रस्थापित केला आहे. २००२च्या गोध्रा जळीतकांडाचा तपास यंत्रणा, न्यायालये, राजकीय पक्ष, प्रसार माध्यमे व एकूणच जनतेमध्ये खूप ऊहापोह झाला, यापुढेही होत राहील. परंतु गुजरातेतील मुस्लिम हत्याकांडाची नैतिक जबाबदारी अगदी वाजपेयींसकट सामान्य जनतेने मोदींवरच टाकली आहे, ही वस्तुस्थिती आहे.

सहा महिन्यांपूर्वीपासून सर्वात अगोदर प्रचार सुरू करूनसुद्धा भाजपचा निवडणूक जाहीरनामा अजून प्रसिद्ध होऊ शकला नाही, याचे कारणही मोदीच होते. आत्ता तर 'तुमची मते थेट माझ्यापर्यंत पोहोचतील' असे देशातील मतदारांना आवाहन करून मोदींनी भाजपला पूर्णपणे गुंडाळून ठेवले. थोडक्यात, 'मी म्हणजे भाजप' अशी मोदींची भूमिका आहे. वरवर पाहता आर्थिक विकास, भ्रष्टाचार इ. मुद्दे मोदींच्या निवडणूक प्रचारात असले, तरी खरा अजेंडा 'हिंदुत्व' हाच आहे आणि मोदींचे सर्वंकष व एकमुखी नेतृत्व संघाला मान्य असण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ते संघाच्या 'एकचालनुवर्तित्वा'शी सुसंगत आहे. मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत गुजरातमध्ये आणि गेल्या सात महिन्यांत पक्षामध्ये जे वातावरण तयार केले आहे, ते वर सांगितलेल्या फॅसिझमच्या व्याख्येशी तंतोतंत जुळते. 'अब की बार, मोदी सरकार' या घोषणेमागे फॅसिझमचे हेच मॉडेल देशव्यापी करण्याचा रा.स्व. संघाचा मानस आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.


अजेंडा- हिंदुत्वाचा आणि हिंदूविरोधाचा
गेल्या शतकात मराठीत दाजी पणशीकर यांनी महाभारत- एक सूडाचा प्रवास असे एक अतिशय विचारप्रवर्तक पुस्तक लिहिले. त्याची प्रस्तावना विख्यात आणि वंदनीय विचारवंत कै. प्रा. नरहर कुरूंदकर यांनी लिहिली आहे. प्रस्तावनेत त्यांनी दाजींच्या विचारांची, मांडणीची आणि मुळात महाभारताच्या संदर्भात या सर्व गोष्टी कशा दिसतात आणि कुठे बसतात याची जी चिकित्सा केली आहे, ती मुळातूनच वाचायला हवी. कुरूंदकर आपल्या विवेचनात लिहितात, परंपरेच्या विरोधकांची गोष्ट तर सोडूनच द्या. पण परंपरेचे समर्थकसुद्धा परंपरेच्या मूल्यांनुसारही जेव्हा परंपरेची चिकित्सा करायला बसतात तेव्हा कसा अनवस्था प्रसंग ओढवतो याचे हा ग्रंथ हे एक उत्तम उदाहरण आहे. आज ही गोष्ट आठवण्याचे कारण म्हणजे मटाच्या १५ एप्रिल २०१४ च्या अंकातला डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा खरा अजेंडा हिंदुत्व हाच हा लेख. रा. स्व. संघ, भाजप आणि श्री. नरेंद्र मोदी ही फासिस्ट, हुकुमशाही आणि परागतिशील विचारसरणी यांची प्रतीके आहेत असे पुरोगामी विचारवंत श्री. मुणगेकर यांना वाटत असेल तर त्यांनी तसे जरूर मानावे आणि त्यावर आपला दृढ विश्वास ठेवावा. पण तो विश्वास कसा तर्कशुद्ध आहे आणि पुराव्याने सिद्ध होऊ शकतो हे दाखवण्यासाठी लेख लिहिण्याच्या फंडात पडू नये. कारण मग आपणच बनवलेल्या तार्किक विचारांच्या जंजाळात फसण्याचा धोका आहे. मुणगेकरांच्या लेखात याचा जागोजागी प्रत्यय येतो.

मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कोणतेही निष्कर्ष तर्कशुद्ध केव्हा म्हणता येतील? जर समान पद्धतीने समान निकष लावून येणारे उत्तर हेच निष्कर्षाचा आधार असेल तेव्हाच ना? म्हणजे उदाहरणार्थ, समजा ने आणि ने एकाच क्षमतेचे रस्ते बांधायला वेगवेगळा काळ लावला आणि वेगवेगळा खर्च केला तर त्या रस्त्यांचा दर्जा तरी वेगवेगळा असला पाहिजे किंवा या कामात भ्रष्टाचार तरी झाला असला पाहिजे. आता आपण उपलब्ध सर्व निकष लावून सिद्ध करून दिले की दोन्ही रस्त्यांचा दर्जा एकसारखाच आहे, तर ज्याने जास्त खर्च दाखवला त्याने या कामात भ्रष्टाचार केला असे म्हणण्याचे धैर्य आपण दाखवले पाहिजे. निकष जे काही सांगतील ते मान्य करायची तयारी असेल तरच निकष लावण्याचा उपद्व्याप करण्यात अर्थ आहे. अन्यथा ते निकष कुणाला लावले आहेत यावरून जर निष्कर्ष काढायचे असतील, तर निकष लावण्याचे ढोंग तरी कशाला करायचे? आपले आधी ठरलेले निष्कर्ष ठोकून द्यावेत आणि मोकळे व्हावे.

आता थेट लेखाकडे वळायचे ठरले तर काय दिसते? काही अनंत काळापासून चालत आलेली असत्ये आणि मर्यादित सत्ये पुन्हा एकदा ठोकून दिली जात आहेत हे तर सुरवातीलाच दिसते. संघ परिवाराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि गांधीजींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही हे असेच एक ठाशीव विधान. आजवर असंख्य लेखकांनी आणि चिकित्सकांनी पुन्हा पुन्हा दाखवून दिले आहे की हे विधान असत्य आहे. सत्य हे आहे की संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनीच नव्हे तर इतरही अनेक स्वयंसेवकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. तो सहभाग संघाच्या नावावर नोंदला जावू शकत नाही कारण हे सर्व स्वयंसेवक त्या काळात काँग्रेस कार्यकर्ते या नात्याने लढ्यात भाग घेत होते. १९२५ मध्ये रा. स्व. संघाची स्थापना होईपर्यंत काँग्रेस आणि रा. स्व. संघ या दोन्ही ठिकाणी काम करणार्‍या कार्यकर्त्यांची संख्या हरो होती. फार कशाला कॉंग्रेस आणि हिंदुसभा यात काम करणाऱ्या सामाईक कार्यकर्त्यांची संख्याही शेकड्यात होती हे दाखवून देता येते. १९३० नंतर मात्र संघ कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमधला सहभाग आटत गेला हे सत्य आहे आणि त्याचे कारण डॉ. हेडगेवारांच्या मनात तात्कालिक उपाय विरुद्ध दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी उपाय हे द्वंद्व उभे राहिले हेच आहे. आता अशा परिस्थितीत हाती होत्या तेवढ्या शक्तिनिशी का होईना, डॉक्टरांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायला पाहिजे होता असे म्हणणे शक्य आहे आणि असे कुणाचे मत असेल तर त्याच्यापुरते ते योग्य म्हणता येईल. पुरेशी शक्ती नसणे हे कारण राष्ट्रीय चळवळीत भाग न घेण्यासाठी योग्य आहे काय हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे आणि तो रास्तही आहे. पण हा फक्त मतभेदांचा प्रश्न राहील. मूळच्या विधानातून जसे स्वातंत्र्यलढयाशी बेईमानी केल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न होतो तसा तो रहाणार नाही. पण प्रश्न तर तोच आहे ना! मुणगेकरांना काय साधायचे आहे? खर्‍या-खोट्याची चाड न बाळगता फक्त कुणाला तरी झोडपायचे आहे की खरोखर काही विचार मांडायचा आहे?

भारत हे अनादी काळापासून हिंदूराष्ट्र म्हणून अस्तित्वात आहे या विधानावरची टीकाही अशीच सत्याचा विपर्यास करून करण्यात आलेली आहे. राष्ट्र ही संकल्पना सतराव्या शतकात प्रथम युरोपमध्ये अस्तित्वात आली ही गोष्ट संघ परिवारासकट कुणीही नाकारत नाही. पण संघ परिवार राष्ट्र या कल्पनेचे दोन भाग मानतो. एक- इहलौकिक जीवनाला अग्रस्थान मिळाल्यानंतरच्या काळात मान्य झालेली भौतिक आणि आज राष्ट्र या शब्दाने बोधित होणारी संकल्पना. दुसरी- पारलौकिक आणि धार्मिक जीवनाला अग्रस्थान असलेल्या काळात एकत्वाची भावना जन्माला घालणारी अर्ध-धार्मिक आणि सांस्कृतिक राष्ट्रसंकल्पना. आता मुणगेकरांना ही दुसरी संकल्पना मान्य नसेल तर त्यांनी तसे म्हणावे हवे तर. पण सांस्कृतिक राष्ट्रवादाची कल्पना मला मान्य नाही हे म्हणणे निराळे आणि संघ परिवार अस्तित्वात नसलेल्या गोष्टी बोलत आहे हे म्हणणे निराळे. मुणगेकरांना जे मान्य नाही ते कुठे अस्तित्वातच नाही हा केवळ हट्टीपणा झाला. मुणगेकरांना काय हवे आहे?

आता मुणगेकरांच्या लेखातील मॅथ्यु एन. लीऑस या विचारवंताने सांगितलेल्या फॅसिझमच्या लक्षणांकडे वळले तर काय दिसते? अति उजवी आर्थिक आणि सामाजिक-राजकीय विचारसरणी हे पहिले लक्षणच घ्या ना. ही काय संघ परिवाराची मक्तेदारी आहे काय? मुळात अति उजवी आर्थिक विचारसरणी अशी काही गोष्ट आज अस्तित्वात तरी आहे काय? मार्क्सवादाच्या दबावा-प्रभावाखाली भांडवलशाही हीच मुळी आज मूळ अवस्थेत राहिलेली नाही. कल्याणकारी राज्याच्या संकल्पना, दर ठराविक काळाने सत्ता जनतेकडून मान्य करून घेणे (दुसर्‍या शब्दात म्हणजे निवडणूकप्रधान लोकशाही), निर्वाह भत्ता आणि जीवनावश्यक अन्न-पाणी-निवारा-औषधोपचार यांसारख्या गोष्टी सर्व नागरिकांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने पुरवण्याचा प्रयत्न या सर्व गोष्टी म्हणजे मार्क्सवादी भाषेतल्या शोषणाचा विस्तार कमी करण्याचे प्रयत्न नाही आहेत काय? अति उजवी विचारसरणी सामाजिक असंतोष नियंत्रणाबाहेर जाऊ नये या कारणासाठी का होईना, पण आर्थिक विषमताही मर्यादेत राखण्यासाठी धडपडत आहेत. जागतिक भांडवलदारीची संरक्षक अमेरिका जगातlली सर्वात  मोठी सामाजिक सुरक्षितता योजना राबवते. तथाकथित अति-उजवी आर्थिक विचारसरणी राबवू पहाणारा एकतरी देश आज जगाच्या पाठीवर मुणगेकरांना दिसतो आहे काय? युरोप-अमेरिका तर सोडाच, पण अगदी आशिया-आफ्रिकेत तरी? अगदी हुतू, रवांडा आणि त्या जातकुळीतली काही नावे सोडली (तीही सोडायची ती अति-उजवे आहेत म्हणून नव्हे, तर विचारसरणी या गोष्टीपासूनच ते अति-दूर आहेत म्हणून) तर जगातले सर्व देश आज याच मार्गावर नाहीत काय? आणि अमेरिकेपासून झिम्बाब्वेपर्यन्तच्या संपूर्ण जगाची दिशा बदलण्याइतकी शक्ती संघ परिवारात आहे असे मुणगेकरांना म्हणायचे आहे काय? मुणगेकर कुणाला आणि काय सांगू पहात आहेत?

जी गोष्ट आर्थिक विचारसरणीची तीच सामाजिक-राजकीय विचारसरणीची. संघ परिवाराचा प्रत्येक सदस्य असामान्य आहे, सार्‍या जगाची दिशा बदलू शकत आणि पहात आहे, किमान जगातल्या या सर्व बदलांपासून स्वतःला संपूर्णपणे अलिप्त राखू शकत आहे, वातावरणाचे आणि जीवनशैलीचे काही संस्कार आजही त्याच्यावर आजीबात होत नाही आहेत असे मुणगेकर सुचवू पहात आहेत काय? आणि तसे आहे तर ती मोठीच मनोरंजक गोष्ट आहे. कारण सर्व डाव्या विचारसरणीचे पक्ष आणि त्यातले विचारवंत संघ परिवार मुस्लिम-ख्रिश्चन समाजाबद्दल असा विचार करतो अशी ओरड करीत असतात. मग संघ परिवार मुस्लिम-ख्रिश्चनांबद्दल जसा विचार करतो (आणि म्हणून तो प्रतिगामी आहे) अगदी तस्साच विचार संघ परिवाराबद्दल करणारे कोणत्या अर्थाने पुरोगामी आहेत? अधिक अ-व्यक्तीगत पद्धतीने सांगायचे तर अ ने ब बद्दल एका पद्धतीने विचार करणे हे जर प्रतिगामी आहे तर फ ने अ बद्दल तशाच पद्धतीने विचार करणे पुरोगामी कसे असू शकते? म्हणजे मुणगेकर स्वतःलाही भाजप- संघाच्याच जागी नेऊन बसवत आहेत आणि तेही संघ परिवाराच्याच माळेचे मणी आहेत काय?

एक मोठी गमतीची गोष्ट आहे. आपण आज कुणाला लोकांना भावनिक आवाहन करून उद्दीपित करणं, प्रत्येक बाबतीत फक्त आपणच लोकांची इच्छा व्यक्त करतो असा दावा, सर्वंकष सत्ता हातात केंन्द्रित झालेला एकच सर्वोच्च नेता याव्याख्येत बसणारा स्वातंत्र्योत्तर भारतातला एक नेता निवडायला सांगितला तर कोणते नाव फारसा विचार न करता चटकन पुढे येईल? बरोबर- इंदिरा गांधी. आता वर एकेरी अवतरणात दिलेली सर्व लक्षणे मुणगेकरांच्या फॅसिझमच्या लक्षणांमधूनच घेतली आहेत. राजीव गांधींनी इंदिरा हत्येनंतर शिखांच्या हत्याकांडाची जी संभावना केली तीही सर्वश्रुतच आहे. मग आता फॅसिझमकडे झुकणारा नेता कोण? ज्यांचे आयुष्य आप्लायासमोर आहे आणि ज्याला ही लक्षणे लागू पडतात त्या इंदिरा गांधी की ज्याच्याबद्दल मुणगेकरांना पुरावाहीन संशय आहे ते नरेंद्र मोदी? खरी पण सर्वच मुणगेकरांना न आवडणारी गोष्ट अशी आहे, कि समाजच मागास असतो तिथे समाजातूनच उभे राहिलेले नेतृत्व ही सर्व लक्षणे कमी-अधिक प्रमाणात दाखवतच असते. फरक प्रमाणाचा असतो, प्रकाराचा नव्हे. त्यामुळे असे शिक्के हातात धरून या नेतृत्वाकडे पहाताच येत नाही. पण मुणगेकरांना हे कोण आणि कसे समजावणार?


मुणगेकरांच्या या लेखाबद्दल एक गंमत करून पहाण्यासारखी आहे. या संपूर्ण लेखात नरेंद्र मोदी या नावाच्या जागी इंदिरा गांधी हे नाव घालायचे आणि मग इतर अनुषंगिक बदल करायचे (म्हणजे उदा. अडवानी याऐवजी निजलिंगप्पा हे नाव घालायचे असे.) आणि मग हा लेख पुन्हा संपूर्ण वाचायचा. लेख आतापेक्षा जास्त उचित, अचूक आणि पुराव्यावर आधारित वाटेल. सर्व मुद्दे जसेच्या तसे ठेवूनही. मुणगेकर स्वतःचे तर्कशास्त्र स्वतःच मारायला सज्ज झाल्यासारखे दिसताहेत असे त्यांच्या मूळ लेखाबद्दल माझे मत झाले हे आता पटायला हरकत नाही.

(श्री मुणगेकरांचा लेख एप्रिलमधला असताना त्याचा प्रतिवाद आता कशाला असा प्रश्न कदाचित मनात येईल. त्याचे उत्तर हे आहे  प्रतिवाद निवडणुकीच्या वातावरणात करण्याची  इच्छा नव्हतॆ.  प्रतिवाद मुद्द्यांच्या आधारे पाहिला जावा, प्रचाराच्या आधारे नव्हे हेच मला अभिप्रेत आहे.)